राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी अध्यक्षपदाची निवडणूक लढण्याचा निर्धार केला. त्यानंतर राजस्थानचा मुख्यमंत्री कोण होणार यावरून मोठा राजकीय पेच निर्माण झाला. काँग्रेसचे नेते सचिन पायलट यांच्या नावाला गेहलोत समर्थक आमदारांनी विरोध दर्शवला आहे. तर, काँग्रेसच्या ९० आमदारांनी राजीनामा देण्याची धमकी दिली आहे.

राजस्थानमधील सत्तासंघर्षाचा पेच सोडवण्यासाठी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी काँग्रेसचे प्रभारी अजय माकन आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे यांना पाठवले होते. मात्र, आता गेहलोत यांच्याजवळील समजले जाणारे काँग्रेसचे आमदार शांती धारीवाल यांनी अजय माकन यांच्यावर गंभीर आरोप केला आहे.

हेही वाचा – “काँग्रेसला स्वत:चे घर संभाळता येत नाही,” राजस्थानवरून केजरीवालांनी चोळलं जखमेवर मीठ

“सचिन पायलट यांना मुख्यमंत्री…”

“अजय माकन हे एकतर्फी निर्णय घेणार होते. सचिन पायलट यांना मुख्यमंत्री करण्यासाठी अजय माकन यांचा प्रयत्न होता. त्यांच्या या निर्णयानंतर आमदारांनी माझ्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला. सर्व आमदार माकन यांच्या वर्तवणुकीनंतर नाराज आहेत,” असे शांती धारीवाय यांनी म्हटलं.

हेही वाचा – राजस्थानमध्ये राजकीय संकट निर्माण झालेलं असताना सचिन पायलट यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले “मी दिल्लीला…”

“अशोक गेहलोत यांना बाजूला करून…”

“आम्ही सोनिया गांधी यांच्याविरोधात नाही आहोत. मात्र, धोका देणाऱ्यांना पाठिंबा देऊ शकत नाही. अशोक गेहलोत यांना बाजूला करून सचिन पायलट यांना मुख्यमंत्री करण्याचा अजय माकन यांचा कुटील डाव होता. सचिन पायलट यांनी काँग्रेस पक्ष सोडला तरी आमच्याजवळ बहुमत असेल,” असा दावाही शांती धारीवाल यांनी केला आहे. एनडीटीव्हीने याबाबत वृत्त दिलं आहे.