सरदार वल्लभभाई पटेल यांनी देशासाठी दिलेले योगदान काँग्रेसने कधीही नाकारले नाही, असे काँग्रेस नेत्या शीला दीक्षित यांनी स्पष्ट केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी त्यांच्या भाषणात काँग्रेसवर टीका करत सरदार वल्लभभाई पटेल यांचे योगदान काँग्रेसने नाकारले, अशी टीका केली होती. त्याला शीला दीक्षित यांनी उत्तर दिले. पंडित जवाहरलाल नेहरू आणि सरदार वल्लभभाई पटेल देशाच्या स्वातंत्र्यासाठी त्यांच्या मार्गाने लढले आणि त्यांनी स्वातंत्र्य मिळवले, हे देशाचा इतिहास सांगतो. ज्यांना हा इतिहास ठाऊक नाही ते काँग्रेसवर टीका करत आहेत, असाही टोला दीक्षित यांनी लगावला.

सरदार वल्लभभाई पटेल यांचे स्वातंत्र्य लढ्यातील आणि देशाच्या जडणघडणीतील योगदान मोठे आहे. आम्ही ते कसे काय विसरणार? जे आमच्यावर टीका करत आहेत ते चुकीची वक्तव्ये करत आहेत. सरदार पटेल यांचे देशाबाबतचे योगदान भाजप सरकार विसरले आहे. सध्याच्या पिढीला सरदार पटेल कोण हे ठाऊकच नाही. त्यांचा इतिहास जाणीवपूर्वक पुसला जातो आहे… किंवा जो सांगितला जातो आहे तो पुरेसा नाही, अशीही टीका शीला दीक्षित यांनी केली. सरदार पटेल यांची आज जयंती आहे देशभरात हा दिवस राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरा करण्यात येतो.