काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी आज काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरुर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. या निवडणुकीत काँग्रेसच्या जी-२३ नेत्यांचा थरुर यांना पाठिंबा नसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहेत. जी-२३ नेत्यांपैकी कोणीही उमेदवारी अर्जावर प्रस्तावक म्हणून स्वाक्षऱ्या करण्यासाठी येणार नाही, असा अंदाज थरुर यांना आला होता. हा अंदाज काही अंशी खरा ठरला आहे. जी-२३ सदस्यांपैकी केवळ लोकसभा खासदार संदीप दिक्षीत यांनी थरुर यांच्या उमेदवारी अर्जावर प्रस्तावक म्हणून सही केली, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

Congress President Election: काँग्रेस अध्यक्षपदासाठी शशी थरुर यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज, मल्लिकार्जून खर्गेही निवडणुकीच्या रिंगणात

तर दुसरीकडे जी-२३ गटातील आघाडीचे नेते भुपिंदर सिंह हुड्डा, आनंद शर्मा, मनिष तिवारी आणि पृथ्वीराज चव्हाण यांनी मल्लिकार्जून खर्गे यांना पाठिंबा देत त्यांच्या उमेदवारी अर्जावर स्वाक्षऱ्या करत आश्चर्याचा धक्का दिला आहे. “मी जी-२३ गटाच्यावतीने निवडणुकीसाठी उभा नाही. त्यांच्याकडून पाठिंब्याचीही मला अपेक्षा नाही. माझे लक्ष्य पक्षाला पुनर्जीवित करणे असून पक्षात मला व्यत्यय आणायचा नाही”, अशी प्रतिक्रिया यावर शशी थरुर यांनी दिली आहे.

“आम्ही संपूर्ण देशातून स्वाक्षऱ्या घेत आहोत. आमच्याकडे आधीपासूनच वेगवेगळ्या नामांकन अर्जांवर किमान ५० ते ५५ स्वाक्षऱ्या असणे आवश्यक आहे. मला आशा आहे की या स्वाक्षऱ्यांमधून कार्यकर्त्यांचे मत पुढे येईल”, असे थरुर ‘इंडियन एक्स्प्रेस’ला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले आहेत. काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी थरुर गंभीर नाहीत, असा मतप्रवाह जी-२३ सदस्यांमध्ये असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.