काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि नेते राहुल गांधी सध्या तामिळनाडूच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी राहुल गांधी यांनी आपली दिवाळी कन्याकुमारी येथील सेंट जोसेफ मॅट्रिक उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांसोबत साजरी केली. त्यांनी शाळेतील विद्यार्थ्यांसोबत पारंपरिक नृत्य केले आणि संवाद साधला. त्या संभाषणाचा व्हिडिओ ट्विटरवर शेअर करत राहुल गांधींनी या भेटीने त्यांची दिवाळी अधिक खास बनली असे म्हटले आहे.

राहुल गांधी यांनी शनिवारी संध्याकाळी त्यांच्या ट्विटर हँडलवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. “सेंट जोसेफ शाळेतील मित्रांशी बोललो आणि एकत्र जेवण केले. त्यांच्या भेटीने दिवाळी अधिक खास बनवली. संस्कृतींचा हा संगम आपल्या देशाची सर्वात मोठी ताकद आहे आणि ती आपण वाचवली पाहिजे,” असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.

व्हिडिओमध्ये राहुल गांधी यांनी काही महिन्यांपूर्वी सेंट जोसेफ स्कूल मूलगुमुदन, तामिळनाडूला भेट दिली होती आणि तेथून ते काही दिवसांपूर्वी दिल्लीत आले होते असे म्हटले आहे. राहुल गांधी म्हणाले की, आमच्यात खूप मनोरंजक संभाषण झाले आणि त्यांच्यासोबत जेवण केले. त्याचवेळी या व्हिडिओमध्ये एका व्यक्तीने राहुल गांधींना विचारले की, जर सरकार स्थापन झाले तर पंतप्रधान म्हणून पहिला निर्णय काय घेणार, तेव्हा त्यांनी महिलांना आरक्षण देऊ असे म्हटले आहे.

विद्यार्थ्यांशी संवाद साधताना राहुल गांधी म्हणाले की, जर मला कोणी विचारले की तुम्ही तुमच्या मुलाला काय शिकवाल, तर मी नम्रता म्हणेन, कारण नम्रतेने तुम्हाला समज येते. रात्रीच्या जेवणात काय घ्यायचे आहे, अशी विचारणाही राहुल गांधींनी विद्यार्थ्यांना केली. यानंतर त्यांनी स्वतःच सुचवले की आपण इथे छोले भटुरा खाण्याची व्यवस्था करूया का? दरम्यान, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केंद्रातील मोदी सरकारवर सातत्याने निशाणा साधला आहे. शनिवारी त्यांनी एलपीजीच्या दरवाढीच्या मुद्द्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आणि पंतप्रधानांच्या विकासाची गाडी रिव्हर्स गियरमध्ये असून ब्रेकही निकामी झाल्याची टीका त्यांनी केली. एलपीजीच्या किमती वाढल्यामुळे लाखो कुटुंबांना स्टोव्ह पेटवावा लागत असल्याचे त्यांनी बातमीचा हवाला देत म्हटले.