भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्यासंदर्भात केलेल्या जातीवाचक टिप्पणीमुळे सध्या राजकीय वातावरण तापले आहे. शहा यांचे हे वक्तव्य स्वातंत्र्यलढ्याचा आणि महात्मा गांधी यांचा अपमान करणारे आहे. हा देशद्रोह असून भाजपने याबद्दल तात्काळ माफी मागितली पाहिजे, अशी मागणी काँग्रेस पक्षाने केली आहे. सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांची विचारपद्धती अशी असेल तर भाजप देशाला कोणत्या दिशेने नेऊ पाहत आहे, याची कल्पना न केलेलीच बरी. महात्मा गांधी यांच्यासंदर्भात केलेल्या या विधानासाठी अमित शहा, भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माफी मागितली पाहिजे, अशी मागणी सुरजेवाला यांनी केली.

महात्मा गांधी बहुत चतुर बनिया था ! , अमित शहांची मुक्ताफळे

अमित शहा यांनी शुक्रवारी छत्तीसगढमधील एका कार्यक्रमात बोलताना महात्मा गांधी यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले होते. काँग्रेस पक्ष हा कोणत्या एका विचारधारेवर किंवा सिद्धांतावर उभा नाही. काँग्रेस हा केवळ स्वातंत्र्य प्राप्त करण्यासाठीचे साधन होते. दूरदृष्टी असलेल्या महात्मा गांधी यांना काँग्रेस पक्षाचे भवितव्य माहिती होते. ते एक चलाख व्यापारी होते. त्यामुळेच त्यांनी स्वातंत्र्यानंतर लगेच काँग्रेस पक्ष विसर्जित करण्यास सांगितले होते. शहा यांच्या या वक्तव्यामुळे मोठा गदारोळ झाला होता. काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी शहा यांच्या वक्तव्याचा निषेध केला. शहा यांनी स्वातंत्र्यसैनिकांचा व महात्मा गांधींचा अपमान केला आहे. मुळात स्वातंत्र्यापूर्वी इंग्रज हिंदू महासभा आणि संघासारख्या शक्तींचा वापर करून देशात फूट पाडत, असा प्रतिहल्ला सुरजेवाला यांनी केला. भाजपदेखील आज मोजक्या उद्योगपतींसाठी ‘स्पेशल पर्पज व्हेईकल’प्रमाणे काम करत असून त्यांच्या उद्योगांची काळजी घेत आहे. भाजपला जात आणि धर्माच्या आधारावर देशात फूट पाडायची आहे. त्यामुळे भाजप त्याविरुद्ध लढण्याऐवजी या सगळयाला प्रोत्साहन देत आहे, म्हणूनच भाजप राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा जातीवाचक उल्लेख करते. यावरून सत्ताधारी पक्षाच्या चारित्र्य व विचारधारेची स्पष्ट कल्पना येते, अशा शब्दांत सुरजेवाला यांनी भाजपवर हल्ला चढवला.

जातीय शक्तींच्या वाढत्या प्रभावामुळे देशातले वातावरण गढूळ- शरद पवार