Congress Stand on Operation Sindoor : पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारताने पाकिस्तान आणि पाकव्याप्त जम्मू काश्मीरमध्ये बुधवारी ७ मे रोजीच्या मध्यरात्री हवाई हल्ले केले. या हल्ल्यांमध्ये भारतीय लष्कराने दहशतवादी तळांना लक्ष्य केलं होतं. भारतीय लष्कराच्या या कारवाईचे जगभरातून कौतुक केले जात आहे. आता विरोधी पक्षानेही यासंदर्भातील भूमिका जाहीर केली आहे. काँग्रेसची या संदर्भात महत्त्वाची बैठक नुकतीच पार पडली असून पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे.
“पाकिस्तानातील दहशतवाद्यांच्या तळांवर हल्ला करून भारताने सडेतोड उत्तर दिलं आहे. आम्ही आमच्या वीर सैनिकांच्या साहस आणि राष्ट्रभक्तीला सलाम करतो. पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या दिवसापासून काँग्रेसने पूर्णपणे लष्कर आणि सरकारला दहशतवाद्याविरोधात निर्णायक कारवाईला समर्थन दिलं होतं. पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये उत्पन्न होणाऱ्या दहशतवाद्यांविरोधात भारताची राष्ट्रीय नीती स्पष्ट आहे”, असं काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले.
देशातील सुरक्षा, एकता आणि स्वातंत्र्य कायम राखण्याकरता समर्थन
“महान भारत देशाची राष्ट्रीय एकता, अखंडतेच्या सुरक्षेकरता सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस देशातील वीर जवानांबरोबर त्यांच्या खांद्याला खांदा लावून उभी आहे. इतिहास साक्ष आहे की आमच्या राष्ट्रीय नेत्यांनी राष्ट्रीय हिताला प्राधान्य देऊन देशाच्या अखंडतेसाठी प्राणाच बलिदानही दिले आहे, हे देश आणि जगाला माहितेय. देशात सुरक्षा, एकता आणि स्वातंत्र्य कायम अबाधित ठेवण्याकरता आम्ही भारतीय लष्कर आणि भारतीय सरकारला पूर्ण समर्थन देत आहोत. या मुद्द्यांवरून कोणताही भेदभाव नाही. इंडिया आघाडीचे लोकही देशातील सुरक्षेसाठी एकत्र येऊन काम करतील”, असं मल्लिकार्जु खर्गेंनी स्पष्ट केलं.
तर, दहशतवादविरोधातील लढाईसाठी भारतीय लष्कराला आमचं पूर्णपणे समर्थन असेल, अशी प्रतिक्रिया राहुल गांधी यांनी दिली. तसंच, उद्या (८ मे) होणाऱ्या सर्वपक्षीय बैठकीला काँग्रेसच्या खासदारांना आमंत्रण असल्याची माहितीही राहुल गांधी यांनी दिली.