पीटीआय, रियाध (सौदी अरेबिया) : परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर रविवारी तीन दिवसांच्या दौऱ्यावर येथे दाखल झाले. पहिल्या दिवशी सौदीचे परराष्ट्रमंत्री राजपुत्र फैजल बिन फरहान यांच्याशी त्यांनी द्विपक्षीय चर्चा केली. ‘जी-२० परिषदे’सह अन्य बहुराष्ट्रीय व्यासपीठांवर परस्परांना सहकार्य करण्याबाबत उभयपक्षी एकमत झाल्याचे जयशंकर यांनी या भेटीनंतर सांगितले.

भारत आणि सौदी यांनी संयुक्तरित्या स्थापन केलेल्या ‘संरक्षण, सामाजिक आणि सांस्कृतिक सहकार्य समिती (पीएसएससी)’ची मंत्रीस्तरावरील ही पहिलीच बैठक होती. सध्याच्या जागतिक आणि आर्थिक मुद्दय़ांवरही चर्चा झाल्याचे जयशंकर यांनी स्पष्ट केले. तत्पुर्वी, त्यांनी प्रिन्स सौद अल फैजल परराष्ट्रसंबंध अभ्यास संस्थेमध्ये भाषण केले. भारत आणि सौदी अरेबियाचे अनेक शतकांचे संबंध असून सध्याच्या कालखंडात दृढ संबंधांची अधिक गरज असल्याचे जयशंकर यांनी सांगितले.