एकीकडे देशात १ मे पासून व्यापक स्तरावर लसीकरण केलं जाणार असताना दुसरीकडे देशातील करोना दिवसेंदिवस अधिकाधिक भीषण होऊ लागला आहे. रविवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून जाहीर करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार देशभरात २४ तासांत तब्बल २७६७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे करोनामुळे आत्तापर्यंत भारतात झालेल्या मृतांची संख्या १ लाख ९२ हजार ३११ इतकी झाली आहे. त्यासोबतच २४ तासांमध्ये सलग चौथ्या दिवशी भारतात ३ लाखांहून जास्त करोनाबाधित सापडले आहेत. रविवारच्या आकडेवारीनुसार २४ तासांत ३ लाख ४९ हजार ६९१ नव्या करोनाबाधितांची भर पडली आहे. त्याचवेळी देशात बरे झालेल्या रुग्णांची संख्या देखील वाढली असून आजघडीला देशात करोनाचे एकूण २६ लाख ८१ हजार ७५१ अॅक्टिव रुग्ण आहेत.

 

देशात आजपर्यंत एकूण १ कोटी ६९ लाख ६० हजार १७२ करोनाबाधित सापडले आहेत. तर त्यापैकी १ कोटी ४० लाख ८५ हजार ११० रुग्ण हे बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे रिकव्हरी रेटच्या बाबतीत काहीसा दिलासा असला, तरी गेल्या दोन महिन्यांमध्ये देशातील करोनाची रुग्णसंख्या आणि मृतांचा आकडा मोठ्या प्रमाणावर वाढू लागला आहे. त्यामुळे अनेक राज्यांनी संचारबंदी, जमावबंदी, करोना निर्बंध किंवा लॉकडाऊन असे पर्याय स्वीकारून करोनावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न सुरू ठेवला आहे.

मुंबईत सेरो चाचणीचे निष्कर्ष : बिगरझोपडपट्टी परिसरात अँटिबॉडीजचे प्रमाण अधिक!

देशात करोनाचा प्रसार वाढू लागलेला असताना रेमडेसिविर इंजेक्शन, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर यांचा तुटवडा जाणवू लागला आहे. अनेक भागांमध्ये ऑक्सिजनच्या अपुऱ्या पुरवठ्यामुळे रुग्णांचे जीव गेल्याच्या देखील घटना घडल्या आहेत. या प्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयात आणि देशाच्या इतरही न्यायालयांमध्ये खटले देखील सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर अनेक राज्यांनी केंद्र सरकारने पुरेसा ऑक्सिजन आणि रेमडेसिविरचा साठा उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे.

Covaxin Price : कोवॅक्सिन लसीचेही नवे दर जाहीर! खासगी रुग्णालयांसाठी कोविशिल्डपेक्षा दुप्पट किंमत!

रेमडेसिविर, लसीसाठी महाराष्ट्रात ग्लोबल टेंडर!

दरम्यान येत्या काळात रेमडेसिविर आणि लसींची वाढती मागणी लक्षात घेता आता राज्य सरकारने याबाबत मोठा निर्णय घेतला आहे. रेमडेसिविर आणि करोनाच्या ज्या ज्या लसींना देशात मान्यता मिळाली आहे, त्या लसींच्या पुरवठ्यासाठी ग्लोबल टेंडर काढण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. १ मे पासून ग्लोबल टेंडरची प्रक्रिया सुरू केली जाणार असल्याचं देखील राज्य सरकारकडून सांगण्यात आलं आहे.