नवी दिल्ली : गेल्या २४ तासांत देशात २८,५९१ जणांना करोनाचा संसर्ग झाल्यामुळे करोनाबाधितांची एकूण संख्या ३,३२,३६,९२१वर पोहचली. याचवेळी, उपचाराधीन रुग्णांच्या संख्येत घट होऊन ती ३,८४,९२१ इतकी झाली. याच काळात ३३८ जणांचा करोनाने मृत्यू झाल्यामुळे, करोनामृत्यूंचा एकूण आकडा ४,४२,६५५ वर पोहचला, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीत म्हटले आहे.

उपचाराधीन रुग्णांची संख्या ६५९५ ने कमी होऊन ती ३,८४,९२१ इतकी झाली. हे प्रमाण एकूण रुग्णांच्या १.१६ टक्के आहे. आतापर्यंत ३,२४,०९,३४५ लोक बरे झाले असून, हे प्रमाण ९७.५१ टक्के इतके आहे. देशात आतापर्यंत देण्यात आलेल्या करोना प्रतिबंधक लशींच्या मात्रांची संख्या ७३.८२ कोटींपलीकडे गेली आहे. गेल्या २४ तासांत मृत्युमुखी पडलेल्या ३३८ जणांपैकी १८१ केरळमधील, तर ३५ महाराष्ट्रातील आहेत.