नवी दिल्ली : देशातील रुग्णसंख्येत गेल्या २५९ दिवसांतील सर्वात कमी रुग्णसंख्या सोमवारी नोंदली गेली आहे. गेल्या २४ तासांत १०,४२३ रुग्णांची नोंद झाली, तर ४४३ जणांचा मृत्यू झाला आहे. सलग २५ दिवसांपासून दैनंदिन रुग्णसंख्या ही २० हजारांखाली, तर सलग १२८ दिवसांपासून ५० हजारांखाली नोंदल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मंगळवारी जाहीर केले आहे.

देशातील उपचाराधीन रुग्णांतही सातत्याने घट होत आहे. गेल्या २५० दिवसांतील सर्वात कमी उपचाराधीन रुग्णसंख्या सोमवारी नोंदली गेली आहे. १ लाख ५३ हजार ७७६ रुग्णसंख्या नोंदली गेली असून ही संख्या एकूण रुग्णसंख्येच्या ०.४५ टक्के इतकी आहे. ही टक्केवारी मार्च २०२० नंतर इतकी कमी नोंदली गेली आहे. तर करोनामुक्त होण्याची टक्केवारीदेखील ९८.२१ इतकी झाली असल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जाहीर केले आहे.

 गेल्या २४ तासांत सक्रिय रुग्णांमध्ये ५,०४१ ने घट झाली आहे. 

देशभरात आतापर्यंत एकूण ३ कोटी ४२ लाख ९६ हजार २३७ जणांना करोनाची लागण झाली आहे. तर करोनाबळींची एकूण संख्या ४ लाख ५८ हजार ८८० झाली आहे. तर मृत्यू दर १.३४ टक्के नोंदला गेला आहे.  आतापर्यंत ३ कोटी ३६ लाख ८३ हजार ५८१ जण करोनामुक्त झाले आहेत.

दैनंदिन रुग्णवाढीचा दर १.०३ टक्के इतका नोंदला असून गेल्या २९ दिवसांपासून रुग्णवाढीचा दर २ टक्क्यांहून कमी नोंदला गेला आहे. साप्ताहिक रुग्णवाढीचा दर १.१६ टक्के नोंदला आहे. सलग ३९ दिवसांपासून साप्ताहिक रुग्णवाढीचा दर २ टक्क्यांहून कमी नोंदला गेला आहे. भारतात लसीकरण झालेल्यांची संख्या १०६.८५ कोटी झाली आहे.