११,४६६ नवे रुग्ण, ४६० जणांचा मृत्यू देशातील रुग्णसंख्येत किंचित वाढ झाली असून गेल्या २४ तासांत ११,४६६ रुग्णांची नोंद झाली तर ४६० जणांचा मृत्यू झाला आहे. सलग ३३ दिवसांपासून दैनंदिन रुग्णसंख्या ही २० हजारांखाली तर सलग १३६ दिवसांपासून ५० हजारांखाली नोंदल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने बुधवारी जाहीर केले आहे. देशातील उपचाराधीन रुग्णांतही सातत्याने घट होत आहे. गेल्या २६४ दिवसांतील सर्वात कमी उपचाराधीन रुग्णसंख्या मंगळवारी नोंदली गेली आहे. १ लाख ३९ हजार ६८३ रुग्णसंख्या नोंदली गेली असून ही संख्या एकूण रुग्णसंख्येच्या ०.४१ टक्के इतकी आहे. ही टक्केवारी मार्च २०२० नंतर इतकी कमी नोंदली गेली आहे. तर करोनामुक्त होण्याची टक्केवारी देखील ९८.२५ इतकी झाली असल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जाहीर केले आहे. गेल्या २४ तासांत सक्रिय रुग्णांमध्ये ९५५ने घट झाली आहे. देशभरात आतापर्यंत एकूण ३ कोटी ४३ लाख ८८ हजार ११३ जणांना करोनाची लागण झाली आहे. तर करोनाबळींची एकूण संख्या ४ लाख ६१ हजार ५७९ झाली आहे. तर मृत्यू दर १.३४ टक्के नोंदला गेला आहे. आतापर्यंत ३ कोटी ३७ लाख ८७ हजार ०४७ जण करोनामुक्त झाले आहेत. दैनंदिन रुग्णवाढीचा दर ०.९० टक्के इतका नोंदला असून गेल्या ३७ दिवसांपासून रुग्णवाढीचा दर २ टक्क्यांहून कमी नोंदला गेला आहे. साप्ताहिक रुग्णवाढीचा दर १.२० टक्के नोंदला आहे. सलग ४७ दिवसांपासून साप्ताहिक रुग्णवाढीचा दर २ टक्क्यांहून कमी नोंदला गेला आहे. भारतात लसीकरण झालेल्यांची संख्या १०९.६३ कोटी झाली आहे.