देशातील काही ठिकाणी करोना रुग्णवाढ स्थिर असल्याचे केंद्र सरकारने गुरुवारी सांगितले. रुग्णवाढ स्थिर असली तरी दुर्लक्ष करून चालणार नसून केंद्र सरकार करोनास्थितीवर लक्ष ठेवून आहे. देशातील ४०० जिल्ह्यांमध्ये करोना रुग्णवाढीचा दर १० टक्क्यांपेक्षा जास्त आहे, असे केंद्र सरकारच्या वतीने सांगण्यात आले. केंद्रीय आरोग्य विभागाचे सहसचिव लव अगरवाल यांनी पत्रकार परिषद घेऊन देशाातील करोनास्थितीबाबत माहिती दिली. सध्या कर्नाटक, केरळ, तमिळनाडू, गुजरात, आंध्र प्रदेश, राजस्थान या राज्यांमध्ये करोना रुग्णवाढ अधिक असून त्यावर नियंत्रण आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, दिल्ली, ओदिशा, हरियाणा आणि पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये करोना रुग्णवाढीचा दर कमी होत असल्याचे दिसून आले आहे, अशी माहिती अगरवाल यांनी दिली. करोनाच्या तिसऱ्या लाटेत रुग्णांना सौम्य लक्षणे दिसून येत असून आधीच्या लाटांपेक्षा उपचाराधीन रुग्णांची संख्या आणि करोनाबळींची संख्या कमी आहे, असे अगरवाल म्हणाले. देशातील ४०० जिल्ह्यांत साप्ताहिक रुग्णवाढीचा दर १० टक्क्यांपेक्षा अधिक आहे, तर १४१ जिल्ह्यांमध्ये पाच ते १० टक्के आहे. ओमायक्रॉन या करोनाच्या उत्परिवर्तित विषाणूच्या रुग्णांची संख्या डिसेंबरमध्ये १,२९२ होती. जानेवारीत ही संख्या वाढून ९,६७२ झाल्याचे आरोग्य विभागाने सांगितले. देशातील एकूण उपचाराधीन रुग्णांपैकी ७७ टक्के रुग्ण १० राज्यांतील असून ११ राज्यांत ५० हजारांपेक्षा अधिक उपचाराधीन रुग्ण आहेत. कर्नाटक, महाराष्ट्र आणि केरळ या राज्यांमध्ये तीन लाखांपेक्षा अधिक उपचाराधीन रुग्ण आहेत, असे अगरवाल यांनी सांगितले.