भारतातील करोनाचे संकट थांबण्याचे नाव घेत नाही आहे. गेल्या काही दिवसांपासून ४० हजारांच्या आसपास रुग्ण समोर येत आहेत. मात्र शनिवारी करोनाबाधितांमध्ये घट झाल्याचे पाहायला मिळाले. भारतात गेल्या २४ तासांत ३६ हजार ०८३ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे, तर ४९३ जणांचा मृत्यू झाला आहे. शुक्रवारी ३८,६६७ नव्या रुग्णांची नोंद झाली होती. त्याचबरोबर, देशभरात गेल्या २४ तासांत ३७,९२७ रुग्णांनी करोनावर मात केली आहे. त्यामुळे २३३७ सक्रिय रुग्णांमधे घट झाली आहे.

आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, देशात आतापर्यंत ३ कोटी २१ लाख ९२ लाख लोकांना करोनाची लागण झाली आहे. त्यापैकी ३ कोटी १३ लाख ७६ हजार बाधितांनी करोनावर मात केली आहे. देशात सध्या ३ लाख ८५ हजार अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

देशात आतापर्यंत ५४ कोटी ३८ लाख ४६ हजार २९० करोनावरील लसीचे डोस देण्यात आले आहेत. तर गेल्या २४ तासांत ७५ लाख ५० हजार ५५३ नागरिकांना लस देण्यात आली आहे.

केरळमध्ये सर्वाधिक रुग्ण

केरळमध्ये करोनाबाधितांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. गेल्या २४ तासांमध्ये १,३९,२२३ नमुने चाचणीसाठी पाठवण्यात आल्यानंतर १९,४५१ लोकांची चाचणी सकारात्मक आली. तर १०५ रुग्णांना करोनामुळे आपले प्राण गमवावे लागले आहेत.

महाराष्ट्रातील परिस्थिती

राज्यात शनिवारी दिवसभरात करोनातून बरे झालेल्यांपेक्षा नवीन बाधितांची संख्यी ही अधिक आढळली आहे. याशिवाय, करोनाबाधित रूग्णांच्या मृत्यू संख्येतही मोठी भर पडली आहे. शनिवारी दिवसभरात राज्यात ५ हजार ७८७ नवीन करोनाबाधित आढळून आले असून, ५ हजार ३५२ रूग्ण करोनातून बरे झाले आहेत. याचबरोबर १३४ करोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे.