गेल्या २४ तासांत देशात २६,११५ जणांना करोनाचा संसर्ग झाल्यामुळे उपचाराधीन रुग्णांची एकूण संख्या ३ लाख ९ हजार ५७५ वर पोहोचली. तर गेल्या काही दिवसांच्या तुलनेत काल दिवसभरातल्या करोनाबाधितांच्या संख्येत काहीशी घट झाल्याचं चित्र आहे. याच कालावधीत करोनामुळे २५२ जण मृत्युमुखी पडल्याने करोनामृत्यूंचा एकूण आकडा ४,४५,३८५ इतका झाला असल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीत म्हटले आहे.

तर, एकूण ३,२७,४९,५७४ रुग्ण आतापर्यंत बरे झाले असून हे प्रमाण ९७.७५ टक्के इतके आहे. मार्च २०२ पासूनचं हे सर्वाधिक प्रमाण आहे. देशव्यापी लसीकरण मोहिमेत आतापर्यंत करोना प्रतिबंधक लशींच्या ८१ कोटी ८५ लाख १३ हजार ८२७ मात्रा देण्यात आल्या आहेत. गेल्या २४ तासात लस टोचून घेतलेल्या नागरिकांची संख्या ९६ लाख ४६ हजार ७७८ वर पोहोचली आहे.

हेही वाचा – लशींची निर्यात ऑक्टोबरपासून

‘लस मैत्री’ कार्यक्रमांतर्गत, तसेच ‘कोव्हॅक्स’ जागतिक सेतूबाबत आपली बांधिलकी निभवण्यासाठी भारत पुढील महिन्यापासून अतिरिक्त करोना प्रतिबंधक लशींची निर्यात पुन्हा सुरू करेल; तथापि आपल्या स्वत:च्या नागरिकांचे लसीकरण करण्यास सरकारचे सर्वोच्च प्राधान्य असेल, असे आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी सोमवारी सांगितले.

ऑक्टोबरमध्ये सरकारला करोना   लशींच्या ३० कोटींहून अधिक मात्रा मिळतील, तर येत्या तीन महिन्यांत १०० कोटींहून अधिक मात्रा त्याला प्राप्त होतील, अशी माहिती त्यांनी दिली. देशात आतापर्यंत देण्यात आलेल्या करोना प्रतिबंधक लसमात्रांची संख्या ८१ कोटींपलीकडे केली असून, अखेरच्या १० कोटी मात्रा केवळ ११ दिवसांत देण्यात आल्या, असेही त्यांनी सांगितले.