मागील काही दिवसांपासून देशात ज्ञानवापी मशीद प्रकारणावरुन वातावरण चांगलेच तापले आहे. त्यानंतर आता दिल्ली येथील कुतुब मिनारबाबत वेगवेगळे दावे करण्यात येत आहेत. असे असताना भारतीय पुरातत्व विभागाकडून कुतुबमिनार परिसरात उत्खनन करण्यात येणार असल्याचे म्हटले जात होते. याच उत्खननाबबात आता मोठी माहिती समोर आली आहे. केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाने तसे कोणतेही निर्देश दिलेले नाहीत, असे सांगण्यात आले आहे.

हेही वाचा >> “केंद्राने १ रुपयांची कपात केली तर ४१ पैसे राज्यांच्या मालकीचे असतात”; इंधन दरकपातीवरुन माजी अर्थमंत्र्यांची प्रतिक्रिया

ज्ञानवापी मशीद प्रकरण तापलेले असतानाच दिल्लीतील कुतुबमिनार ही ऐतिहासिक वास्तू कुतुबुद्दीन ऐबकने बांधलेली नसून राजा विक्रमादित्य यांना बांधली असल्याचा दावा केला जातोय. तसेच या वास्तूचे नामकरण विष्णूस्तंभ करण्यात यावे, अशी मागणी करण्यात येत आहे. असे असताना शनिवारी सांस्कृतिक मंत्रालयाचे सचिव गोविंद मोहन यांनी कुतुबमिनार परिसराला भेट दिली होती. त्यानंतर केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाने भारतीय पुरातत्व खात्याला कुतुबमिनार परिसरात उत्खनन करण्याचे निर्देश दिल्याचे म्हटले जाऊ लागले. मात्र हे वृत्त सांस्कृतिक मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी फेटाळून लावले आहे. कुतुबमिनार परिसरात उत्खनन करण्याचे कोणतेही निर्देश दिले नसल्याचं या आधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.

हेही वाचा >> “अमेरिकेच्या दबावाला न जुमानता…”; इंधन दरकपातीवरुन इम्रान खान यांच्याकडून मोदी सरकारचे कौतुक

शनिवारी गोविंद मोहन यानी कुतुबमिनार भागाची जळपास दोन तास पाहणी केली होती. त्यांच्यासोबत वरिष्ठ अधिकारी तसेच इतिहासकार उपस्थित होते. गोविंद मोहन यांची ही नियमित भेट होती, असे सांगितले जात आहे. तसेच या भेटीदरम्यान कुतुबमिनार परिसराच्या देखभालीवर चर्चा करण्यात आल्याचं सांगण्यात आलंय.

हेही वाचा >> भारतात स्फोटक स्थिती, ठिणगीचाच अवकाश!; राहुल गांधी यांची इंग्लंडमध्ये टीका : देशातील लोकशाही ढासळणे जगासाठी धोकादायक

कुतुबमिनारचं नामकरण विष्णूस्तंभ करा

दरम्यान, कुतुबमिनार ही वास्तू कुतुबुद्दीन ऐबक यांनी नव्हे तर राजा विक्रमादित्य यांनी बांधली होती, असा दावा भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाचे (ASI) माजी प्रादेशिक संचालक धर्मवीर शर्मा यांनी केला आहे. राजा विक्रमादित्य यांनी सूर्यात होणाऱ्या बदलाची स्थिती जाणून घेण्यासाठी कुतुबमिनारची निर्मिती केली होती. पाचव्या शतकात ही वास्तू बांधण्यात आली होती, असं त्यांनी म्हटलंय.