अफजल गुरुला फाशी दिल्याच्या पार्श्वभूमीवर देशातील संवदेनशील भागात हाय-अलर्ट जारी करण्यात आला आहे.
कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी राजधानी दिल्लीतील सुरक्षाव्यवस्थाही वाढविण्यात आली. त्याचबरोबर केंद्रीय गृह मंत्रालयाने सर्व राज्य सरकारना संवेदनशील भागातील सुरक्षाव्यवस्था वाढविण्याचे निर्देश दिले आहेत. दिल्लीतील बाजारपेठा, रेल्वेस्थानक, मेट्रोस्थानके, बसस्थानके येथील सुरक्षाव्यवस्थाही वाढविण्यात आली आहे.
अफजल गुरु हा जम्मू-काश्मीरचा रहिवासी असल्याने त्याच्या फाशीची प्रतिक्रिया काश्मीर खोऱयात  उमटण्याची शक्यता गृहीत धरून तेथे संचारबंदी लागू करण्यात आली आहे. काश्मीर खोऱयात सकाळी साडेसहापासूनच संचारबंदी लागू करण्यात आली. अफजल गुरुला फाशी देण्याला काश्मीरमधील काही संघटनांनी विरोध केला होता. त्यापार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी संचारबंदी लागू करण्यात आली.