हवाई वाहतूक क्षेत्रातील सार्वजनिक विमानसेवा कंपनी एअर इंडियाच्या सर्व्हरवर सायबर हल्ला झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. फेब्रुवारी २०२१च्या शेवटच्या आठवड्यात हा हल्ला करण्यात आला असून, ऑगस्ट २०११ ते ३ फेब्रवारी २०२१ या कालावधीतील ४५ लाख लोकांची माहिती लीक झाली असल्याचं एअर इंडियानं म्हटलं आहे. या माहितीत प्रवाशांच्या नावासह जन्म तारीख, संपर्क क्रमांक, पासपोर्टवरील माहिती, क्रेडिट कार्डची माहिती यासह इतर माहिती चोरली गेली आहे.

एअर इंडियाच्या प्रवाशांची माहिती साठवण्यात आलेल्या एका डेटा सर्व्हरवर सायबर हल्ला करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. ४५ लाख प्रवाशांची माहिती चौरीला गेली असून, एअर इंडियाने निवदेन प्रसिद्ध करून सायबर हल्ल्याची माहिती दिली आहे. फेब्रुवारी २०२१च्या शेवटच्या आठवड्यात सीता या सर्व्हरवर अत्याधुनिक सायबर हल्ला झाला. यातून प्रवाशांची महत्त्वाची माहिती चोरीला गेली आहे. यात प्रवाशाच्या नाव, जन्म तारीख, पासपोर्टबद्दलची माहिती, क्रेडिट कार्डबद्दलची माहिती, तिकीटाबद्दलची माहिती आणि इतर माहिती चोरीला गेली आहे.

सायबर हल्ल्यामुळे सर्व्हरमधील २६ ऑगस्ट २०११ ते ३ फेब्रुवारी २०२१ या कालावधीतील प्रवाशांची माहिती लीक झाली आहे. आमच्या मौल्यवान असलेल्या प्रवाशांना आम्ही सूचित करू इच्छितो की, डेटा सर्व्हवर सायबर हल्ला झाल्याची माहिती प्रवासी सेवा पुरवठा प्रणालीकडून मिळाली आहे. सध्या कंपनी डेटा प्रोसेसर प्रतिबंधात्मक उपाययोजना करत आहे. आम्ही प्रवाशांना त्यांची माहिती सुरक्षित ठेवण्यासाठी पासवर्ड बदलण्यासाठी सांगत आहोत, असं एअर इंडियाने म्हटलं आहे.

सीता हे सर्व्हर जिनोव्हा शहराच्या बाहेर असून, सर्व्हरमध्ये बाहेर कोणताही माहिती टाकण्यात आलेली नाही. एअर इंडिया सध्या भारतातील आणि भारताबाहेर विविध एजन्सीच्या संपर्कात आहे. त्यांना या घटनेबद्दल माहिती देण्यात येत असल्याचं एअर इंडियानं म्हटलं आहे. हा डेटा SITA या सर्व्हरद्वारे चोरला गेला आहे. हा डेटा प्रोसेसर प्रवाशांच्या सेवेसाठी काम करतो. प्रवाशांचा डेटा साठवून ठेवण्याची आणि तो प्रोसेस करण्याची जबाबदारी त्याद्वारे होते. क्रेडिट कार्डबद्दलचा डेटा लीक झाला असला, तरी CVV नंबरच्या डेटाची चोरी झालेली नाही. हा सर्व्हर हॅक झाल्यानंतर त्याची सुरक्षितता वाढवण्यात आली आहे, असंही एअर इंडियाने म्हटलं आहे.