केंद्र सरकारच्या आश्रयाखाली देशातील कट्टरतावादी शक्ती जोमाने वाढत असून दादरी येथील घटना त्याचेच फलित असल्याचा आरोप मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रकाश करात यांनी शनिवारी केला. या शक्ती मुस्लिम समाजाला लक्ष्य करत असून त्यांना गोवंश हत्येच्या नावाखाली समाजात ध्रुवीकरण घडवून आणायचे असल्याचे करात यांनी म्हटले. यावेळी करात यांनी परदेश दौऱ्यांच्या मुद्द्यावरून नरेंद्र मोदींवर टीका केली. परदेशात असंख्य दौरे केलेत तरी देशात परकीय गुंतवणूक आणता येणार नाही. त्यासाठी देशाचा अंतर्गत विकास होणे, गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.
काही दिवसांपूर्वी दिल्लीपासून अवघ्या ४५ किलोमीटर अंतरावर दादरी येथे घरात गोमांसाचा साठा करून त्याचे सेवन करतात, अशी अफवा पसरल्याने मोहम्मद अखलख या व्यक्तीला जमावाने ठार मारले होते. या मारहाणीत अखलख यांचा २२ वर्षीय मुलगाही गंभीर जखमी झाला होता.