कुख्यात “ड्रग माफिया’ आणि “अंडरवर्ल्ड डॉन’ दाऊद इब्राहिमचा विश्‍वासू साथीदार इक्‍बाल मोहम्मद मेमन (६१) ऊर्फ इक्‍बाल मिर्ची याचा आज (गुरूवार) लंडनमध्ये मृत्यू झाला. ह्रदयविकाराच्या झटक्य़ानं त्याचा मृत्यू झाल्याचं बोलंल जातंय. लंडनच्या हॉर्न चर्च येथील एसेक्‍स टाऊन परिसरातील सहा शयनकक्षांच्या आलिशान फ्लॅटमध्ये पत्नी आणि मुलांसह तो राहत होता. २० वर्षे परदेशात वास्तव्याला असलेल्या मिर्चीला मुंबईत आणण्यासाठी भारतीय तपास संस्था गेली काही वर्षे प्रयत्नशील होत्या. लंडनमध्ये झालेल्या अटकेनंतर त्याला ताब्यात घेण्याच्या मुंबई पोलिसांच्या हालचालींना वेग आला होता. मात्र, पोलिसांचा तो प्रयत्न अयशस्वी ठरला.
मुंबईत १९९३ मध्ये झालेल्या बॉम्बस्फोट मालिकेपूर्वी इक्‍बाल मोहम्मद मेमन (६१) ऊर्फ इक्‍बाल मिर्ची दाऊद बरोबर भारत सोडून पळून गेला होता. दाऊद इब्राहिमचा उजवा हात समजला जाणाऱ्या इक्‍बाल मिर्चीचा अमली पदार्थांच्या तस्करीचा कारभार जगभरात पसरता होता. त्याच्यावर १९८६ ते ८८ दरम्यान अमली पदार्थांच्या तस्करीचे गुन्हे दाखल आहेत. याशिवाय १९९५ मध्ये माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलिस ठाण्याच्या हद्दीत जहांगीर आर्ट गॅलरीजवळ त्याचा विश्‍वासू साथीदार आणि भागीदार अमर सुवर्णा याची हत्या झाली होती. इक्‍बाल मिर्चीने व्यावसायिक वैमनस्यातून त्याची हत्या घडवल्याचे उघडकीस आले होते. या प्रकरणात तो आजही गुन्हे शाखेच्या पोलिसांना तो हवा होता.
लंडन येथील एका अपघाताच्या गुन्ह्यात त्याला पोलिसांनी अटक केली होती. सीबीआयने १९९४ मध्ये त्याच्याविरुद्ध इंटरपोलची “रेड कॉर्नर’ नोटीसही बजावली होती. लंडन आणि दुबई येथे वास्तव्य असलेल्या इक्‍बालला २००४ मध्ये अमेरिकेच्या इलिनॉईस राज्यात अटक करण्यात आली होती; मात्र त्यातून त्याची सुटका झाली होती.
अंमली पदार्थांच्या तस्करीतून त्यांने अफाट संपत्ती कमावली होती. कच्छी मेमन कुंटबात जन्मलेल्या इक्‍बालचा मिरची पावडर तयार करण्याचा पिढीजात व्यवसाय होता. म्हणून त्याला इकिबाल मिर्ची हे नाव पडलं होतं. अमली पदार्थांच्या तस्करीतून गुन्हेगारी जगतात शिरकाव केलेला इक्‍बाल दाऊदच्या खास मर्जीतील समजला जातो. त्याने अमली पदार्थांच्या तस्करीतून आलेल्या पैशांतून “रिअल इस्टेट’मध्ये मोठी गुंतवणूक केली आहे. मुंबईत वरळी येथे तीन इमारती, माहीम येथे दोन इमारती, जुहू येथेही इमारत आणि पाचगणी येथे इमारती अशी मालमत्ता त्याने जमवली होती. पण कालंतराने यापैकी अनेक मालमत्ता सरकारनं ताब्यात घेतली.