पाकिस्तानात लपून बसलेल्या कुख्यात दाऊद इब्राहिमला संपविण्यासाठी योजना आखली होती, मात्र मुंबई पोलीस दलातील काही भ्रष्ट अधिकाऱ्यांमुळे याची बातमी दाऊदला मिळाल्याने त्याने आपला ठिकाणा बदलल्याचा दावा तत्कालीन गृहसचिव व भाजप नेते आर. के. सिंह यांनी केला आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी हा दावा केला आहे.
अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना दाऊदला पाकिस्तानात घुसून मारण्याची योजना बनविण्यात आली होती. यासाठी छोटा राजन टोळीतील काही गुंडांची मदत घेण्यात येत होती. त्यांचे एका अज्ञातस्थळी प्रशिक्षणदेखील सुरू होते. याच वेळी डी-कंपनीशी संबंध असलेले पोलीस अधिकारी प्रशिक्षण सुरू असलेल्या ठिकाणी अटक वॉरंट घेऊन दाखल झाले. यामुळे ही योजना फसल्याचे सिंह यांनी सांगितले. मुंबई पोलीस तेव्हा अटक वॉरंट घेऊन आले होते. मात्र याबाबत आपण ठोस माहिती देऊ शकत नाही. आपल्याजवळ याबाबत पुरावे नसल्याचे सांगतानाच आपण याबाबत फक्त ऐकले असल्याची सारवासारव सिंह यांनी केली.