नवी दिल्ली : औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबादचे धाराशीव हे नामकरण करून गुलामीची खूण कायमची पुसण्याचे काम राज्य सरकारने केले आहे. या नामांतराचा आम्हाला अभिमान आहे, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शनिवारी म्हणाले. केवळ शहराचे नाव नव्हे, तर तालुका, जिल्हा, नगरपालिका आणि महापालिका या सगळय़ा स्तरांवर नाव बदलले जाईल. यामध्ये कुठलाही संभ्रम नाही. हाती घेतलेले काम आम्ही कधीही अपूर्ण ठेवत नाही. दोन्ही जिल्ह्यांची नावे बदलण्याची अधिसूचना महसूल मंत्रालयाकडून, तर नगरपालिका आणि महापालिकेचे नाव बदलण्याची अधिसूचना नगरविकास मंत्रालयाकडून सोमवारी काढली जाईल, अशी माहिती देऊन फडणवीस यांनी नामांतराच्या राज्य सरकारच्या निर्णयाला केंद्र सरकारने मंजुरी दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे फडणवीस यांनी आभार मानले. दिल्लीत अखिल भारतीय ब्राह्म महासंघाच्या ‘ब्रह्मोद्योग-२०२३’ या कार्यक्रमात फडणवीस सहभागी झाले होते. या कार्यक्रमानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपकडून पैसे वाटप केल्याचा विरोधकांचा आरोप खोटा असून प्रचार करता येत नसल्याने राजकीय स्टंट केला जात आहे, असेही फडणवीस म्हणाले. इतर समाजातील तरुणांनाही मदत करा देशात ब्राह्मण समाजाची संख्या तुलनेत कमी असली तरी हा समाज साखरेचे काम करतो. या समाजाने काळानुसार बदलण्याची गरज आहे. ब्राह्मण समाजातील तरुण निराश झालेले दिसतात; पण त्यांनी आपला दृष्टिकोन व विचार बदलले पाहिजेत. विविध क्षेत्रांत कार्यरत असलेल्या ब्राह्मण समाजातील लोकांनी या तरुणांना मदत केली पाहिजे, तर त्यांच्यातील निराशा कमी होईल. दोन ब्राह्मण तरुणांना मदत करताना अन्य समाजातील एका तरी तरुणाला मदत केली पाहिजे, असे फडणवीस म्हणाले.