योगगुरू बाबा रामदेव यांनी गायीला भारताचा राष्ट्रीय प्राणी म्हणून घोषित करावे, अशी मागणी केंद्र सरकारकडे केली आहे. रविवारी आंध्र प्रदेशात गो महासंमेलनाला संबोधित करताना बाबा रामदेव यांनी हे वक्तव्य केले आहे. तिरुमाला तिरुपती देवस्थान (टीटीडी) आयोजित केलेल्या या कार्यक्रमात सहभागी होताना बाबा रामदेव म्हणाले की, गायीला भारताचा राष्ट्रीय प्राणी म्हणून घोषित करायला हवे. हा प्रस्ताव टीटीडी ट्रस्टनेही पाठवला असल्याचे त्यांनी सांगितले. ते म्हणाले की, मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे मागणी करतो की त्यांनी लवकरात लवकर गायीला देशाचा राष्ट्रीय प्राणी म्हणून घोषित करावे. बाबा रामदेव म्हणाले की, पतंजलीने गायींसाठी गोरक्षण मोहीम सुरू केली आहे. गायींच्या सुरक्षेसाठी आणि संरक्षणासाठी आम्ही आघाडीवर आहोत. यादरम्यान, योगगुरू म्हणाले की आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वायएस जगन मोहन रेड्डी यांनी त्यांना टीटीडी गो महासंमेलनाबद्दल माहिती दिली होती. हिंदू धर्माचा प्रचार केल्याबद्दल त्यांनी टीटीडीचे अध्यक्ष वायव्ही सुब्बा रेड्डी यांचेही कौतुक केले.