१९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोटांच्यावेळी बेकायदा शस्त्रास्त्र बाळगल्याप्रकरणी नुकताच तुरूंगातून शिक्षा भोगून परतलेल्या संजय दत्तला स्वच्छ भारत अभियानाचा सदिच्छा दूत (ब्रँड अॅम्बेसिडर) नेमण्यावरून नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. दिल्ली महानगरपालिकेकडून संजयला स्वच्छ भारत अभियन आणि स्मार्ट सिटीचा सदिच्छा दूत होण्यासाठी विचारणा करण्यात आली आहे. संजय दत्त त्याची ४२ महिन्यांची शिक्षा पूर्ण करून २५ फेब्रुवारीला पुण्याच्या येरवाडा तुरूंगातून सुटला होता. यानंतर दिल्ली महानगपालिकेकडून संजयला पत्राद्वारे सदिच्छा दूत होण्यासंदर्भात विचारणा करण्यात आली आहे. तरूणांचा आदर्श आणि देशातील महत्त्वाची व्यक्ती असल्यामुळे तुम्ही आमच्या दोन मोहीमांमध्ये सहभागी व्हावे, अशी विनंती महापालिकेतर्फे करण्यात आली आहे. यामुळे शहरात स्वच्छता राखण्यात नागरिक उद्युक्त होतील, अशी दिल्ली पालिकेने आपल्या पत्रात म्हटले आहे. यानंतर संजय दत्तकडूनही या प्रस्तावाला सकारात्मक प्रतिसाद देण्यात आल्याचे समजते.