काही लोक फटाके उडवण्याचा संबंध धर्म आणि राजाकरणाशी जोडत आहेत, असं विधान दिल्लीचे पर्यावरण मंत्री गोपाल राय यांनी केलं आहे. दिल्लीतल्या हवेची पातळी आता अत्यंत खराब या श्रेणीपर्यंत घसरली असून दिवाळीत फटाके उडवल्यानंतर ही पातळी आणखी खाली घसरेल अशी शक्यता नुकतीच वर्तवण्यात आली होती.

याबद्दल बुधवारी झालेल्या पत्रकार परिषदेत राय यांनी भाष्य केलं आहे. ते म्हणाले, “तुमच्या राजकारणासाठी लहानग्यांच्या आणि प्रौढांच्याही जीवाशी खेळू नका. राजकारण करण्यासाठी इतरही अनेक मुद्दे आहेत. दिल्लीतल्या लोकांना श्वास घेऊ द्या”. फटाक्यांवर बंदी असूनही अनेक जण दिवाळीत फटाके उडवतील अशी शक्यताही त्यांनी वर्तवली आहे.

हेही वाचा – Gold Silver: दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर सोन्याच्या भावात घसरण; जाणून घ्या आजचा दर

राय पुढे म्हणाले, “विरोधी पक्षाला राजकारण करण्याचा पूर्ण अधिकार आहे. पण हा लोकांच्या जीवाचा प्रश्न आहे. दिवाळी हा दिव्यांचा सण आहे, फटाक्यांचा नाही”. दिवाळीनिमित्त उत्तरप्रदेश, हरियाणा आणि पंजाबमध्ये अतिधुराचे फटाके वाजवण्यात बंदी घालण्यात यावी, असं आवाहन राय यांनी केंद्र सरकारला केलं आहे.

राय पुढे म्हणाले, “राज्याचे धूळ नियंत्रणाचे नियम मोडणाऱ्या बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणांकडून एक कोटींहून अधिक दंड वसूल करण्यात आला आहे”. या ऑक्टोबरमध्ये दिल्लीत गेल्या पाच वर्षांतील सर्वात स्वच्छ हवा असल्याचे राय म्हणाले. दिल्लीतील प्रदूषणाचे मुख्य स्त्रोत धूळ आणि धूर आहेत. थंडीमुळे कचरा जाळण्यापासून होणारे उत्सर्जन वाढण्याची शक्यता असून, दिवाळीनंतर कचरा जाळण्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी मोहीम राबवली जाईल, असे ते म्हणाले.