राजधानी दिल्ली आज पहाटे एका भीषण आगीच्या घटनेनं हादरली. येथील धान्य बाजार परिसरातील एका वसाहतीमधील पेपर कारखान्याला लागलेल्या भीषण आगीत तब्बल ४३ निष्पाप लोकांना जीव गमवावा लागला. शिवाय अनेकजण होरपळले गेले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. जवळपास ५० पेक्षा अधिक लोकांना वाचवण्यात अग्निशामक यंत्रणांना यश आले आहे. शॉर्टसर्किटमुळे ही आग लागली असल्याचे सांगण्यात येत असून, बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. मात्र याचबरोबर या इमारतीत बेकायदेशीररित्या कारखाना चालवला जात होता व अग्निशमन विभागाकडून कोणत्याही प्रकारचा परवाना देखील घेतला गेलेला नव्हता, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. शिवाय, एनडीआरएफच्या जवानांना ही इमारत घातक अशा कार्बन मोनोऑक्साइडने भरलेली असल्याचे आढळून आले असून अनेकांचा यामुळेच गुदमरून मृत्यू झाल्याची देखील माहिती देण्यात आली आहे.

आणखी वाचा- दिल्लीतील अग्नितांडव : घटनेची न्यायालयीन चौकशी; मृतांच्या कुटुंबीयांना दहा लाखांची मदत

या पार्श्वभूमीवर आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह यांनी, जर कोणत्याही प्रकारचा अग्शिमन दलाचा परवाना न घेता, जर या ठिकाणी बेकायदेशीरपणे कारखाना चालवला जात होता तर तो का बंद केला गेला नाही? असा प्रश्न महापालकेस धारेवर धरले आहे.

अग्शिशामक दलास पहाटे ५ वाजून २२ मिनिटांनी आग लागली असल्याची माहिती फोनद्वारे कळवण्यात आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. यानंतर अग्निशामक दलाची ३० वाहनं घटनास्थळी पोहचली. आगीत अडकलेल्या अनेकांना बाहेर काढून त्यांना तातडीने आरएमएल आणि हिंदूराव रूग्णालायत दाखल करण्यात आले.

आणखी वाचा- दिल्लीतील अग्नितांडव : मृतांच्या कुटुंबीयांना केंद्र सरकारकडूनही मदत

एनडीआरएफच्या जवानांनी जेव्हा आग लागलेल्या इमरतीत प्रवेश केला तेव्हा, त्यांना घातक कार्बन मोनोऑक्साइडने ही इमारत भरल्याचे आढळून आले. . चार मजली इमारतीत चालणार्‍या बेकायदा उत्पादक युनिटमधील बहुतेक कामगारांचा गुदमरल्यामुळेच मृत्यू झाला. आम्ही जेव्हा प्रत्यक्षपणे इमरतीत शोधमोहीम राबवली तेव्हा, आम्हाला मोठ्याप्रमाणावर कार्बन मोनोऑक्साइड आढळून आला. इमारतीचा तिसरा आणि चौथा मजला पुर्णपणे धुराने व्यापलेला होता, ज्यामध्ये कार्बन मोनोऑक्साइड मोठ्याप्रमाणावर होता, अशी माहिती एनडीआरएफचे डेप्युटी कमांडर आदित्य प्रताप सिंह यांनी दिली. तसेच, त्या ठिकाणी एका खोलीत अनेक कामगार झोपलेले देखील होते आणि ज्या ठिकाणी हवा येण्याची केवळ एकच जागा होती. इमारतीतील साहित्य जळाल्यामुळे, कार्बन मोनोऑक्साइड तयार झाल्याने जास्तीत जास्त कामगारांना तिसऱ्या मजल्यावरून हलवण्यात आले. यावरून कार्बन मोनोऑक्साइडचे प्रमाण असलेले साहित्य या ठिकाणी जास्त असल्याचे स्पष्ट झाले, असेही त्यांनी सांगितले.