आज एक एप्रिल म्हणजेच एप्रिल फूल्स डे. जगभरामध्ये एकमेकांची फसवाफसवी करण्याचा एकमेकांना गोंधळात टाकण्याचा हा दिवस समजला जातो. आज याच एप्रिल फूल्सच्या मुद्द्यावर राज्यामधील सत्ताधारी शिवसेना पक्षाचे खासदार आणि राज्यातील माजी मुख्यमंत्र्यांनी एकमेकांवर टीका केलीय. शिवसेनेचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी भाजपाच्या आश्वासनांचासंदर्भ एप्रिल फूल्सशी जोडल्यानंतर राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अगदी मोजक्या शब्दांमध्ये राऊत यांच्या या टीकेवर प्रतिक्रिया दिलीय.

नक्की वाचा >> “ग्लिसरीनची बाटली घेऊन सगळे पवार लाईनमध्ये उभे होते; शरद पवार पण रडत होते, कधी सुप्रिया सुळे…”

संजय राऊत नेमकं काय म्हणाले?
आज सकाळी राऊत यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये एक एप्रिल म्हणजेच एप्रिल फूल्सचा उल्लेख केला. “देशातील जनतेला राज्यकर्ते नेहमीच एप्रिल फूल करत असतात. पाच राज्याच्या निवडणुका झाल्यानंतर पेट्रोलचे भाव वाढवत एप्रिल फूल केलं. जनतेचे प्रश्न सोडवण्याच्या बाबतीत वर्षानुवर्ष एप्रिल फूल सुरु आहे. एप्रिल फूल हा आता गमतीचा विषय राहिला नसून जगण्या मरण्याचा प्रश्न जनता आणि सरकार यांच्यात झाला आहे. त्यातून मार्ग काढावा लागेल,” असं संजय राऊत यांनी भाजपावर निशाणा साधताना म्हटलं आहे.

नक्की वाचा >> “महाविकास आघाडीचे ९० टक्के आमदार नाराज आहेत असं वाटतं का?” या प्रश्नाला फडणवीस म्हणाले, “यावर मी…”

अच्छे दिन म्हणजे एप्रिल फूलच…
“प्रत्येक सरकार, राजकारण्याने जनतेशी बांधिलता ठेवली पाहिजे. थापा मारणं, फसवाफसवी बंद केली पाहिजे. लोकांच्या जगण्या मरण्याचे प्रश्न गंभीर होत चालले आहेत. गमंत तेवढ्यापुरती ठीक असते. अच्छे दिन येणार, दोन कोटी बेरोजगारांना नोकऱ्या देणार, खात्यात १५ लाख येणार, पाकव्याप्त काश्मीर भारतात येणार हे एप्रिल फूलच आहे. सात वर्षांपासून बेरोजगार वाट पाहत आहेत. महाराष्ट्र आणि देशात सूडाचं करणं एप्रिल फूलच आहे,” अशी टीका संजय राऊत यांनी यावेळी केली.

नक्की वाचा >> ‘कश्मीर फाइल’ रिलीजच होऊ द्यायला नको होता म्हणणाऱ्या पवारांना फडणवीसांनी हसून दिलं उत्तर; म्हणाले, “राष्ट्रवादी…”

फडणवीसांचं उत्तर
नागपूर विमानतळावर फडणवीस यांना पत्रकारांनी राऊत यांनी केलेल्या अच्छे दिन म्हणजे एप्रिल फूलच असल्याच्या टीकेवरुन प्रश्न केला. या प्रश्नाला फडणवीसांनी अगदी मोजक्या शब्दात उत्तर दिलं. “संजय राऊत रोज काहीतरी बोलत असतात. तुम्ही महत्व देता (त्याला) मी महत्व देत नाही,” असा टोला फडणवीस यांनी राऊतांना लगावलाय.