झारखंडच्या धनबाद शहरातील जिल्हा आणि सत्र न्यायाधीश उत्तम आनंद यांच्या मृत्यूबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. मॉर्निंग वॉकला गेलेले जिल्हा आणि सत्र न्यायालयाचे न्यायाधीश उत्तम आनंद यांचा एका दुर्घटनेमध्ये मृत्यू झाला होता. अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज समोर आल्यापासून, हा मुद्दाम केलेला खून असल्याचे मानले जात होते. न्यायाधीश उत्तम आनंद यांना चोरी झालेल्या रिक्षाने धडक दिली होती. त्यानंतर हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोचले आहे. सुप्रीम कोर्ट बार असोसिएशनने या हत्येची सीबीआय चौकशी करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर आता महत्त्वाची माहिती समोर आली आहे. धनबादचे न्यायाधीश उत्तम आनंद यांच्या प्रकरणात सीबीआयने झारखंड उच्च न्यायालयात रिक्षा चालकाने मुद्दाम न्यायाधीशांवर गाडी घातल्याचे सांगितले आहे. सीबीआयच्या सहसंचालकांनी सुनावणीदरम्यान सांगितले की, सीबीआय प्रत्येक बाजूने तपास करत आहे आणि कोणताही गोष्ट यातून सोडली जाणार नाही. यानंतर न्यायालयाने पुढील आठवड्यात प्रगती अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले. घटनेचे विश्लेषण आणि पुनर्बांधणी, सीसीटीव्ही फुटेजची तपासणी आणि उपलब्ध फॉरेन्सिक पुरावे असे सूचित करतात की उत्तम आनंद यांना दोन व्यक्तींनी जाणूनबुजून लक्ष्य केले आणि मारले. झारखंड उच्च न्यायालयाला चौकशीबाबत माहिती देताना सीबीआयने हे सांगितले. खुनाचा तपास अंतिम टप्प्यात आहे. आता उपलब्ध भौतिक पुराव्यांसह फॉरेन्सिक अहवालाद्वारे या प्रकरणाची पडताळणी करत आहे असे सीबीआयने सांगितले आहे. पुराव्यांचा अभ्यास करण्यासाठी सीबीआयने देशभरातून चार वेगवेगळ्या फॉरेन्सिक टीमला नियुक्त केले आहे. सीबीआयचे म्हणणे आहे की तपास पूर्ण होण्याच्या जवळ आहे. पहा घटनेचा व्हिडिओ सीबीआय गुजरातमध्ये दोन्ही आरोपींच्या ब्रेन मॅपिंग आणि लाय डिटेक्टर चाचणीच्या अहवालाचाही अभ्यास करत आहे. या घटनेनंतर दुसऱ्या दिवशी आरोपी लखन वर्मा आणि राहुल वर्मा या दोघांना अटक करण्यात आली. तर ऑटोरिक्षा एका महिलेच्या नावावर आहे. सीबीआयच्या सूत्रांनी सांगितले की, ऑगस्टमध्ये एजन्सीला अनेक महत्त्वाचे पुरावे सापडले. यात आरोपींनी गुन्हा करण्यापूर्वी कॉल करण्यासाठी रेल्वे कंत्राटदाराचे चोरीचे दोन मोबाईल फोन वापरल्याचाही समावेश आहे. २८ जुलै रोजी ४९ वर्षीय न्यायाधीश उत्तम आनंद यांचा ऑटोने धडक दिल्याने मृत्यू झाला होता.