करोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनने व्यापाराचं संपूर्ण गणित बिघडवलं. मात्र, दिवाळीने या व्यवसायिकांना मोठं जीवनदान दिल्याचं पाहायला मिळालंय. यंदाच्या दिवाळीत झालेल्या खरेदीनं व्यवसायाचे मागील १० वर्षांमधील विक्रम मोडले आहेत. व्यापारी संघटना द कंफडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सने (CAIT) याबाबत आकडेवारी जारी करत माहिती दिली. यानुसार, यंदाच्या दिवाळीत आतापर्यंत १.२५ लाख कोटी रुपयांचा व्यवसाय झाला. दिवाळीत नागरिकांना दिलखुलासपणे बाजारात खरेदी केली. यामुळे छोटे व्यावसायिक आणि व्यापाऱ्यांना मोठा फायदा झालाय. दिवाळीत दरवर्षी होणाऱ्या खरेदीचा मागील १० वर्षांचा विक्रम यंदा मोडलाय. या प्रतिसादामुळे भविष्यातही बाजारात चांगली मागणी होऊन बाजारपेठ सुरळीत होईल, अशी अपेक्षा व्यापाऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे. नागरिकांच्या प्रतिसादाने अंदाज मोडीत निघाले करोनामुळे मागील अनेक दिवसांपासून बाजारपेठा ओस पडल्या होत्या. मात्र, दिवाळीनं हे चित्र पालटून टाकलंय. दिवाळीत नागरिक उत्साहाने खरेदीसाठी बाहेर पडले. यामुळे अर्थचक्र पुन्हा सुरळीत होण्यास मदत झालीय. CAIT ने याआधी दिवालीत १ लाख कोटी रुपयांचा व्यवसाय होईल, असा अंदाज लावला होता. मात्र, प्रत्यक्षात नागरिकांच्या प्रतिसादाने हा अंदाज मोडीत काढत नवा विक्रम केला. हेही वाचा : Ahmednagar District Hospital fire : मुख्यमंत्र्यांनी दिले सखोल चौकशीचे आदेश ; दोषींवर कठोर कारवाई होणार! व्यापारी संघटनांनी या वर्षअखेर जवळपास ३ लाख कोटी रुपयांचा व्यवसाय होईल असा अंदाज व्यक्त केला आहे. नागरिकांमध्ये उत्साह आणि नाविन्य असल्यानं हा आकडा गाठला जाईल असं व्यापाऱ्यांना वाटत आहे. यामुळे मागील २ वर्षांमध्ये व्यापाराचं झालेलं नुकसान भरून येण्यास मदत होणार आहे.