एका कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी काँग्रेस नेत्यांना पराभवाने निराश झाल्यानंतर पक्ष न सोडण्याचं आवाहन केलंय. “पराभवानंतर निराश होऊ नका आणि पक्षासोबत राहून काम करा. काँग्रेस मजबूत राहावी अशी माझी मनापासून इच्छा आहे. जे काँग्रेसच्या विचारसरणीचे पालन करतात, त्यांनी पक्षासोबत राहून खंबीर राहावे. पराभवाने खचून न जाता त्यांनी काम करत राहावे. पराभव झाला तर एक दिवस विजयही होणारच,” असं म्हणत त्यांनी काँग्रेस नेत्यांना हिंमत दिली. यावेळी बोलताना गडकरींनी भाजपाला संसदेत फक्त २ जागा जिंकता आल्याची आठवणही सांगितली. ते म्हणाले, "पण कार्यकर्त्यांच्या मेहनतीने काळ बदलला आणि अटलबिहारी वाजपेयींच्या रूपाने आम्हाला पंतप्रधान मिळाला. अशा परिस्थितीत निराश होऊन आपली विचारधारा सोडू नये,” असं आवाहन गडकरींनी काँग्रेस नेत्यांना केलं. काँग्रेस पक्ष मजबूत व्हावा, हीच माझी इच्छा – नितीन गडकरी गडकरी म्हणाले की, “लोकशाहीसाठी काँग्रेस पक्ष मजबूत असणे आवश्यक आहे. सलग निवडणुकीत पराभूत होणारी काँग्रेस पुन्हा मजबूत व्हावी आणि पक्षाचे नेते निराश होऊन पक्ष सोडू नयेत, हीच आपली इच्छा आहे. काँग्रेस पक्ष कमकुवत होत असून देशातील मुख्य विरोधी पक्षाची जागा प्रादेशिक पक्ष घेत आहेत, हे चांगले लक्षण नाही,” असं मत गडकरी यांनी व्यक्त केलंय. लोकमतच्या एका कार्यक्रमात बोलताना गडकरी म्हणाले की, “लोकशाही दोन चाकांवर चालते- सत्ताधारी आणि विरोधक. प्रबळ विरोधी पक्ष ही लोकशाहीची गरज आहे, त्यामुळे काँग्रेस मजबूत असावी अशी माझी इच्छा आहे. त्याचवेळी काँग्रेस कमकुवत असताना त्याचे स्थान प्रादेशिक पक्ष घेत आहेत, जे लोकशाहीसाठी चांगले नाही. त्यामुळे काँग्रेस विरोधी पक्षाची जागा घेण्यासाठी मजबूत झाला पाहिजे,” अशी इच्छा गडकरींनी बोलून दाखवली.