देशातील देखण्या विमानतळांपैकी एक असलेले छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील टर्मिनल-२ आता देशांतर्गत वाहतुकीसाठीही सज्ज झाले असून यातील पहिला टप्पा २५ सप्टेंबर रोजी कार्यान्वित होणार आहे. गो एअर या कंपनीची विमाने आता टर्मिनल १-ए ऐवजी टर्मिनल १-बी वरून रवाना होणार आहेत. तर १ ऑक्टोबरपासून एअर इंडियाच्या सर्व देशांतर्गत विमानांची वाहतूक टर्मिनल-२वरूनच होईल. मात्र, गो एअर कंपनीची मुंबईत उतरणारी विमाने टर्मिनल १-ए येथेच उतरणार आहेत.
शुक्रवार, २५ सप्टेंबरपासून गो एअरची मुंबईबाहेर जाणारी सर्व देशांतर्गत विमाने टर्मिनल १-बी वरून रवाना होतील. या स्थित्यंतराची सुरुवातही टप्प्याटप्प्याने होणार आहे. गो एअर कंपनीचे जी८-३०५ हे चेन्नईला जाणारे विमान सकाळी ४.४५ वाजता १-बी टर्मिनलवरून आकाशात झेपावेल. मात्र या कंपनीची मुंबईत येणारी विमाने टर्मिनल १-ए येथेच उतरणार आहेत. पुढील टप्प्यात ही विमानेही १-बी टर्मिनलकडे वळवली जातील. याच स्थित्यंतराचा भाग म्हणजे एअर इंडियाच्या देशांतर्गत विमानांची पूर्ण वाहतूक आता टर्मिनल-२वरून होणार आहे.
स्थित्यंतरासाठी प्रशिक्षण..
१ ऑक्टोबरपासून हे स्थित्यंतर सुरू होणार असून या कंपनीचे एआय-६२७ हे सकाळी ५.५५ वाजता नागपूरला जाणारे विमान टर्मिनल-२वरून आकाशात झेपावेल. तर हैद्राबादहून येणारे एआय-६९५ हे सकाळी ७.४५ वाजता येणारे विमान टर्मिनल-२वर उतरेल. या स्थित्यंतरासाठी टर्मिनल १-ए व १-बी वरील कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे.