हरियाणातील बहादूरगडमध्ये गुरुवारी (२८ ऑक्टोबर) एका भरधाव ट्रकने ६ आंदोलक महिला शेतकऱ्यांना चिरडलं. यात तिघींचा मृत्यू झालाय, तर तीन महिला शेतकरी गंभीर जखमी झाल्या आहेत. सकाळी साडे सहा वाजता ही घटना घडली. या महिला झज्जर रोडवरील दुभाजकावर (डिव्हायडर) बसलेल्या होत्या. यावेळी भरधाव ट्रक अचानक थेट दुभाजकावर चढला आणि महिलांना चिरडलं. या घटनेवर काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केलीय. ही क्रुरता आणि द्वेष आपल्या देशाला उद्ध्वस्त करत आहे, असं मत राहुल गांधींनी व्यक्त केलं.

पोलिसांनी घटनास्थळावर पोहचून चौकशी सुरू केलीय. २८ ऑक्टोबरला सकाळी साडेसहा वाजता महिला रस्त्यावरील दुभाजकावर बसलेल्या असताना ट्रकने त्यांना चिरडलं. यात २ महिलांचा जागेवरच मृत्यू झाला, तर इतर ४ महिला गंभीर जखमी होत्या. यातील एका महिलेने रुग्णालयात उपचारादरम्यानच अखेरचा श्वास घेतला. मृत सर्व महिला पंजाबमधील मानसा जिल्ह्याच्या रहिवासी आहेत. या महिला सकाळी आपल्या घरी जाण्यासाठी रिक्षाची वाट पाहत दुभाजकावर बसल्या होत्या. त्याचवेळी झज्जर रोडवर उड्डाणपुलाखाली एका ट्रकने त्यांना चिरडलं.

राहुल गांधी म्हणाले, “भारत माता, देशाच्या अन्नदात्याला ट्रकखाली चिरडलंय. ही क्रूरता आणि द्वेष आपल्या देशाला उद्ध्वस्त करत आहे. पीडितांच्या कुटुंबीयांसोबत माझ्या सहवेदना.”

केंद्र सरकारच्या नव्या ३ कृषी कायद्यांविरोधात नोव्हेंबर २०२० पासून दिल्लीच्या सीमेवर विविध शेतकरी संघटना आंदोलन करत आहेत. या महिला देखील या आंदोलनात सहभागी झाल्या होत्या.

हेही वाचा : “आंदोलनाचा अधिकार मात्र रस्ते अडवण्याचा नाही”, राकेश टिकैत म्हणाले ‘सर्वोच्च न्यायालयानं अगदी बरोबर आहे’

दरम्यान, याआधी उत्तर प्रदेशमधील लखीमपूर खेरीत केंद्रीय गृह राज्यमंत्र्यांच्या महिंद्रा थार जीपखाली चिरडून ४ शेतकऱ्यांचा आणि एका पत्रकाराचा मृत्यू झाला होता. त्यानंतर संतप्त आंदोलकांनी केलेल्या मारहाणीत गाडीतील तिघांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशीष मिश्रा मुख्य आरोपी आहे.