मुंबई : क्रूझ पर्यटन अर्थात समुद्र पर्यटन क्षेत्र सध्या झपाटय़ाने वाढत असून या क्षेत्रात मोठी संधी आहे. त्यात भारताला विस्तीर्ण आणि नितांत सुंदर अशी किनारपट्टी लाभली आहे. या पार्श्वभूमीवर भारतातील समुद्र पर्यटनाला चालना देण्यासाठी केंद्र सरकार आणि समुद्र पर्यटनाशी निगडित राज्यांकडून आवश्यक ते सर्व प्रयत्न केले जाणार आहेत. येत्या काळात भारताला जगातील पहिल्या क्रमाकांचे समुद्र पर्यटन स्थळ किंवा केंद्र म्हणून ओळख निर्माण करून देण्याचा प्रयत्न असणार असल्याचा निर्धार केंद्रीय बंदरे, नौवाहन आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी शनिवारी व्यक्त केला. मुंबई बंदर प्राधिकरणाच्या (मुंबई पोर्ट अथॉरिटी) माध्यमातून देशातील पहिल्या अतुल्य भारत समुद्र पर्यटन परिषदेचे २०२२ चे अयोजन मुंबईत करण्यात आले आहे. ट्रायडंट हॉटेल येथे ही परिषद पार पडत असून सोनोवाल आणि केंद्रीय राज्य मंत्री श्रीपाद नाईक यांच्या हस्ते या परिषदेचे उद्घाटन झाले. यावेळी ते बोलत होते. देशात क्रूझ टर्मिनल, जेट्टी उभारणी यासह अनेक पायाभूत सुविधांचा विकास सागरमाला प्रकल्पाअंतर्गत प्रयत्न सुरु आहेत. असे असताना २०२० मध्ये करोना संकट आले आणि त्याचा मोठा फटका समुद्र पर्यटनाला बसला. पण त्यानंतर अर्थात वर्षभरापूर्वी पुन्हा या क्षेत्राला चालना देण्यासाठी प्रयत्न सुरू झाले. परिणामी एका वर्षांत या क्षेत्रात ३५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्याचवेळी येत्या काळात या क्षेत्रात १० टक्क्यांनी वाढ होणार आहे. ही संधी लक्षात घेत भारताला आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रूझ हबह्ण म्हणून ओळख देण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे यावेळी सोनोवाला यांनी सांगितले. यासाठी किनारपट्टी लाभलेल्या सर्व राज्यांना आवश्यक ती सर्व मदत केंद्राकडून करण्यात येईल असेही त्यांनी आश्वासन सांगितले. यावेळी सोनोवाल यांच्या हस्ते पीरपाऊ येथील तिसऱ्या रासायनिक मालवाहू धक्क्याची ई पायाभरणी करण्यात आली. तसेच रत्नागिरी येथील केळशी दीपगृह तसेच धनुष्य कोडी येथील दीपगृहाचे उद्घाटनही यावेळी सोनोवाल यांच्या हस्ते करण्यात आले. क्रूझ टर्मिनल २०२४ पासून पूर्णत: सेवेत सागरमाला प्रकल्पाअंतर्गत देशातील सात प्रमुख बंदरांचा आंतरराष्ट्रीय स्तरावर विकास करण्यात येत आहे. बंदरांच्या आधुनिकीकरणाच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय क्रूझ टर्मिनल उभारण्यात येत आहेत. त्यानुसार मुंबईतही आंतरराष्ट्रीय क्रूझ टर्मिनल बांधण्यात येत आहे. ४९५ कोटी रुपये खर्च करत उभारण्यात येत असलेले हे टर्मिनल जुलै २०२४ मध्ये पूर्णत: सेवेत दाखल होईल अशी माहिती मुंबई बंदर प्राधिकरणाचे अध्यक्ष राजीव जलोटा यांनी दिली.