२०१९ हे वर्ष निवडणुकांचं वर्ष आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कारण याच वर्षात देशाच्या म्हणजेच लोकसभा निवडणुका होणार आहेत आणि त्यानंतर ऑक्टोबर महिन्याच्या आसपास महाराष्ट्राच्या म्हणजेच विधानसभा निवडणुका होणार आहेत. लोकसभा निवडणुकांची घोषणा मार्चच्या पहिल्या आठवड्यात होण्याची शक्यता वर्तवली जाते आहे. कारण केंद्रीय निवडणूक आयोगाने देशातील सगळ्या राज्यांच्या निवडणूक आयोगांना फेब्रुवारी अखेरपर्यंत तयारी करण्याचे आदेश दिल्याची माहिती समोर आली आहे.
Sources: Election Commission of India to announce the 2019 Lok Sabha election schedule in the first week of March, election would be held in 6 to 7 phases
— ANI (@ANI) January 18, 2019
आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाकडून तयारी सुरू आहे. भाजपा-शिवसेनेमध्ये युतीची तर काँग्रेस राष्ट्रवादीमध्ये आघाडीची चर्चा सुरु आहे. सध्याच्या लोकसभेचा कार्यकाळ ३ जून ला संपतो आहे. त्यामुळे मार्चच्या पहिल्या आठवड्यात निवडणुका जाहीर होतील. गेल्यावेळप्रमाणेच लोकसभा निवडणुकांसोबत आंध्रप्रदेश, ओदिशा, सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेश या राज्याच्या विधानसभा निवडणुकाही होण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे. आता मार्चमध्ये निवडणुका जाहीर होणार का? झाल्यास किती टप्प्यात जाहीर होणार? निकाल कधी लागणार हे सगळे समजायचे आहे. मात्र, सहा ते सात टप्प्यात या निवडणुका होतील अशीही शक्यता वर्तवण्यात येते आहे.
या लोकसभा निवडणुकांच्या वेळी पुन्हा एकदा नरेंद्र मोदी विरुद्ध राहुल गांधी अर्थात नमो VS रागा अशीच लढाई पाहण्यास मिळणार आहे. डिसेंबर महिन्यात पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपाला एकाही राज्यात सत्ता मिळवता आली नाही. त्यामुळे या निकालांमधून धडा घेत भाजपाने तयारी सुरु केली आहे. तर पाचपैकी तीन राज्यात काँग्रेसची सत्ता असल्याने काँग्रेसचे कार्यकर्तेही जोशाने निवडणुकांच्या तयारीला लागले आहेत. आता लोकसभा निवडणुकांमध्ये काय होणार? जनता पुन्हा मोदींना कौल देणार की वेगळंच चित्र समोर येणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.