प्रशांत किशोर यांची देशभरात निवडणूक रणनीतीकार म्हणून ख्याती आहे. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाच्या विजयात त्यांचा मोलाचा वाटा होता. त्यानंतर त्यांनी २०१७ साली पंजाबमध्ये काँग्रेस, बिहारमध्ये जेडीयू आणि पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेससाठी निवडणूक रणनिती आखली होती. त्यात त्यांना अपेक्षित यश देखील मिळालं. मात्र आता इतर पक्षांसाठी रणनिती आखण्याऐवजी प्रशांत किशोर स्वत:चा पक्ष स्थापित करणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.

प्रशांत किशोर यांनी एक ट्वीट करत जनतेमध्ये जाण्याची वेळ आल्याचं सांगितलं आहे. याची सुरुवात बिहारमधून होईल, असं सांगितलं आहे. त्यानंतर निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर दोन दिवसांच्या पटना दौऱ्यावर आले आहेत. पाटणा येथे प्रशांत किशोर बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांची भेट घेणार आहेत आणि इतर पक्षांच्या काही प्रमुख नेत्यांनाही भेटणार आहेत. असे मानले जाते की प्रशांत किशोर पाटणा येथून त्यांच्या भावी वाटचालीबद्दल मोठी घोषणा देखील करू शकतात. कारण त्यांनी गेल्या वर्षी सांगितले होते की, बंगालच्या निकालाच्या एक वर्षानंतर ते नवीन घोषणा करतील. प्रशांत किशोर यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, “लोकशाहीत प्रभावी योगदान देण्याची भूक आणि लोकांप्रती कृती धोरणे तयार करण्यासाठीच्या प्रवासात खूप चढ-उतार झाला आहे. आज जेव्हा मागे वळून पाहतो, तेव्हा खऱ्या मालकांमध्ये जाण्याची वेळ आली आहे. म्हणजेच लोकांमध्ये जेणेकरुन त्यांच्या समस्या चांगल्या प्रकारे समजून घेऊन ‘जन सुराज’च्या मार्गावर वाटचाल करता येईल.”

काँग्रेसमधील चर्चा निष्फळ ठरल्यानंतर प्रशांत किशोर राष्ट्रीय आणि प्रादेशिक पातळीवर रणनिती आखत आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रशांत किशोर यांची पार्टी पूर्णपणे आधुनिक, डिजिटल असेल आणि जनसंपर्क करण्याच्या नवीन प्रगत तंत्रज्ञानासह लाँच केली जाईल. पक्षाचे नाव काय असेल याबाबत कोणतीही माहिती नाही.