ALLAHABAD HIGH COURT’S Decision : एका महिलेने बलात्काराचा आरोप केलेल्या एका ४२ वर्षीय आरोपीला अलाहाबाद उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. अयशस्वी नातेसंबंधांमुळे फौजदारी कायद्याचा गैरवापर वाढला असल्याची टीप्पणी सुनावणीवेळी उच्च न्यायालयाने केली. बार अँड बेंचने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे. ९ एप्रिल रोजी न्यायमूर्ती कृष्ण पहल यांनी हा आदेश दिला होता.

“विशेषतः अयशस्वी संबंधांनंतर, दंडात्मक कायद्यांचा वापर करून, वैयक्तिक मतभेद आणि भावनिक कलहाला गुन्हेगारी रंग दिला जात असल्याचे वाढत्या प्रकरणांतून दिसून येत आहे”, असे न्यायालयाने म्हटले आहे. महिलांवरील गुन्ह्यांवर दिलेल्या वादग्रस्त निर्णयांमुळे अलाहाबाद उच्च न्यायालयाला अलिकडेच टीकेचा सामना करावा लागला होता.

२५ वर्षीय महिलेने बलात्काराचा गुन्हा दाखल केल्यानंतर ४२ वर्षीय विवाहित पुरूषाला गेल्या वर्षी अटक करण्यात आली होती. त्याने हे कृत्य रेकॉर्ड केले आणि तिला ब्लॅकमेल केले असाही महिलेचा आरोप आहे. लग्नाचे आश्वासन देऊन तिला सोडून दिल्याचा आरोपही तिने केला.

महिलेने आरोप केला की तो वेगवेगळ्या महिलांना आमिष दाखवत असे आणि यापूर्वी त्याने तीन वेळा लग्न केले होते. महिलेने असेही म्हटले आहे की आरोपी श्रीमंती आणि पैशांच्या जोरावर संपत्ती आणि प्रभावाचा गैरवापर करून तिचं आयुष्य उद्ध्वस्त केले आहे.

परंतु, आरोपीचे प्रतिनिधित्व करणाऱ्या वकिलाने न्यायालयाला सांगितले की, महिला विवाहित आहे हे माहित असूनही ती पुरुषाशी संबंधात होती. तसंच, आरोपीचे आधी लग्न झालेले नाही. युक्तिवादानंतर, उच्च न्यायालयाने म्हटले की हे प्रकरण गुन्हेगारी गैरकृत्याचे प्रकरण नसून ब्रेकअपनंतरच्या भावनिक परिणामांचे उत्पादन असल्याचे दिसून येते.

कायदा नैतिकतेच्या सर्व पैलूंची अंमलबजावणी करत नाही

“सर्व सामाजिक किंवा नैतिकदृष्ट्या संशयास्पद कृतीत कायदेशीर हस्तक्षेपाची आवश्यकता नसते. हे न्यायशास्त्रातील एक मूलभूत तत्व देखील प्रतिबिंबित करते की कायदा नैतिकतेच्या सर्व पैलूंची अंमलबजावणी करत नाही”, असं न्यायाधीश म्हणाले. न्यायालयाने असेही नमूद केले की हे नाते संमतीने होते आणि महिलेला आरोपीचा मागील वैवाहिक इतिहास माहित होता.