नवी दिल्ली: भाजपच्या ‘लोकसभा प्रवासी योजेने’तील मतदारसंघांमध्ये बूथस्तरावर सशक्तीकरणाचा कार्यक्रम हाती घेण्यात येणार असून महाराष्ट्रातील ३५ लोकसभा मतदारसंघांचा आढावा दिल्लीतील दोन दिवसांच्या राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत घेण्यात आला. २०१९च्या लोकसभा निवडणुकीत पराभव झालेल्या १४४ मतदारसंघांमध्ये विजय मिळवण्यासाठी भाजपने केंद्रीय मंत्र्यांच्या प्रवासी योजनेचा पहिला टप्पा पूर्ण केला असून दुसऱ्या टप्प्याचे नियोजन या बैठकीत करण्यात आले. पुढील १५ दिवसांमध्ये प्रदेश समिती व त्यानंतर जिल्हावार समित्या स्थापन करून बैठकीत निश्चित केलेल्या उद्दिष्टांच्या अंमलबजावणीवर देखरेख ठेवली जाईल, अशी माहिती प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. राज्यामध्ये प्रवासी योजनेत १८ लोकसभा मतदारसंघ असून त्यामध्ये २०१९ मध्ये शिवसेनेने लढवलेल्या १२,राष्ट्रवादी काँग्रेसच्या चार, काँग्रेससह अन्य तीन मतदारसंघांचा समावेश आहे. १७ लोकसभा मतदारसंघांची जबाबदारी केंद्रातील मराठी मंत्र्यांकडे आहे. त्यापैकी १२ भाजपकडे असून पाच शिंदे गटाच्या ताब्यात आहेत. उर्वरित १३ मतदारसंघ भाजपचेच आहेत. आता शिंदे गटाशी युती झाल्यामुळे त्यांच्या उमेदवारांना भाजप मदत करेल. तेथे भाजपची संघटना मजबूत करण्याचे काम होत राहील, असा दावा बावनकुळे यांनी केला.