काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी आज लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणाच्या प्रस्तावावर बोलत असताना केंद्र सरकारच्या धोरणांवर जोरदार टीका केली. भारत जोडो यात्रेवरुन परतल्यानंतर राहुल गांधी यांच्या देहबोलीमध्ये एक वेगळाच बदल झाल्याचे त्यांच्या या भाषणात जाणवत होते. सुरुवातील त्यांनी भारत जोडो यात्रेची माहिती दिली. या यात्रेत तरुण, शेतकरी यांनी आपल्या व्यथा मांडल्याचे ते म्हणाले. यावेळी अनेक युवकांनी अग्निवीर योजनेची तक्रार केली असल्याचे राहुल गांधी म्हणाले. तसेच ही योजना सैन्याला देखील रुचलेली नाही, असा दावा त्यांनी केला. सैन्यातील निवृत्त अधिकाऱ्यांनी मला माहिती दिली की, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि अजित डोभाल यांनी ही योजना सैन्यावर थोपवली आहे, अशा खळबळजनक आरोप राहुल गांधी यांनी लोकसभेत केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भारत जोडो यात्रेत ३ हजार ६०० किमी चाललो

“चार महिने आम्ही भारत जोडो यात्रेत होतो. कन्याकुमारी पासून काश्मिरपर्यंत ३ हजार ६०० किमींची पायी यात्री काढली. या यात्रेत मला खूप काही शिकायला मिळाले. जनतेचा, सामान्य लोकांचा, भारतीयांचा आवाज ऐकण्याची संधी मला मिळाली. सुरुवातील चालत असताना लोकांचे ऐकून घेत होतो. त्यावेळी आम्हाला वाटलं, आपणही बोलायला पाहीजे. थोडे पुढे गेल्यानंतर आमचे बोलणे बंद झाले. भारत जोडो यात्रेत जसे जसे पुढे जाऊ लागलो तसे यात्रा आमच्याशी बोलायला लागली”, अशी आठवण राहुल गांधी यांनी सांगितली.

हे वाचा >> Agniveer Recruitment : अग्निवीरांची भरती प्रक्रिया बदलली, आधी CEE, नंतर इतर टप्पे

शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे सरकारचे लक्ष नाही

राहुल गांधी म्हणाले की, अनेक युवक यावेळी मला येऊन भेटत होते, कुणी सांगायचे मी पदवीधर असून बेरोजगार आहे. कुणी सांगायचं मी टॅक्सी चालवतो, कुणी सांगायचं मी रोजंदारीवर जातो. शेतकरी देखील हजारोंच्या संख्येने मला भेटले. पंतप्रधान पिक विमा योजनेबाबत बोलले. आम्ही पिक विमासाठी पैसे भरतो, पण जेव्हा संकट येतं, तेव्हा आम्हाला काहीच मिळत नाही. शेतकऱ्यांनी तर हे देखील सांगितले की, आमची जमीन अधिग्रहीत केली जाते, पण आम्हाला त्याबदलात भरपाई जशी मिळायला हवी तशी मिळत नाही. काही आदिवासी देखील भेटले, वनवासी नाही असे सांगताना राहुल गांधी म्हणाले, आदिवासी बिलावर काहीही कारवाई होत नाही.

अजित ढोबाल यांनी सैन्यावर अग्निवीर योजना थोपवली

राहुल गांधी पुढे म्हणाले, “लोकांचा मुख्य रोख हा बेरोजगारी, महागाई यावर अधिक होता. अग्निवीरबाबतही अनेकांनी माझ्याजवळ त्यांच्या भावना व्यक्त केल्या. अग्निवीरबाबत सरकार काहीही सांगत असले तरी युवक मला सांगत होते की, आम्ही सकाळी ४ वाजता धावायला जातो. खूप तयारी करतो. याआधी आम्हाला सैन्यात १५ वर्षांची सर्विस मिळत होती. आता चारच वर्षांची सेवा देणे बंधनकारक आहे. त्यानंतर काढून टाकले जाईल, पेन्शनही मिळणार नाही. तर काही सैन्यातील माजी अधिकारी देखील या योजनेवर खूश नाहीत. ही योजना सैन्याकडून आलेली नसून राष्ट्रीय स्वयंसवेक संघ आणि केंद्रीय गृहखात्याच्या डोक्यातून आलेली आहे, असे माजी अधिकारी सांगतात. ही योजना सैन्यावर थोपलेली असून अग्निवीर सैन्याला कमकुवत करेल. हजारो लोकांना आपण शस्त्र चालविण्याचे प्रशिक्षण देऊन त्यांना चार वर्षांनी समाजात सोडणार आहोत. बेरोजगारी आहे, समाजात हिंसा वाढू शकते. निवृत्त अधिकारी सांगतात की, ही योजना अजित ढोबाल यांनी सैन्यावर थोपवली आहे.”

हे वाचा >> विश्लेषण: अग्निवीरांचे प्रशिक्षण कुठे आणि कसे सुरु आहे? त्यांचे पुढे काय होणार? जाणून घ्या सविस्तर माहिती

राष्ट्रपती योजनेच्या भाषणात अग्निवीरचा केवळ एकदाच उल्लेख झाला आहे. सैन्य देखील सांगत आहे की, ही योजना आम्हाला नको. पण त्यांचे ऐकले जात नाही. राष्ट्रपतीच्या भाषणात महागाई, बेरोजगारी यावर एकही शब्द नव्हता. जनता तर आम्हाला भारत जोडो यात्रेत याच समस्या सांगत होती. मग राष्ट्रपतीच्या भाषणात या गोष्टी का नाहीत? असा प्रश्न राहुल गांधी यांनी उपस्थित केला.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ex servicemen said idea of agniveer scheme came from rss and ajit doval says rahu gandhi in lok saba kvg
First published on: 07-02-2023 at 15:07 IST