लुधियाना : भारत किसान युनियन (दाकौंदा) तर्फे शुक्रवारी येथे भव्य मेळावा घेण्यात आला. विधानसभेच्या निवडणुकीत युनियनकडून काँग्रेस आणि आम आदमी पक्षाच्या उमेदवारांनाही शेतकऱ्यांच्या समस्यांबाबत जाब विचारला जाईल, असे युनियनच्या नेत्यांनी जाहीर केले. येत्या ३१ जानेवारी रोजी सर्व जिल्हा मुख्यालयांवर केंद्र सरकारच्या विरोधात मोर्चे काढले जातील. पंजाबच्या बर्नाला जिल्ह्यात शुक्रवारी हजारो शेतकरी या मेळाव्यासाठी जमले होते. शेतकऱ्यांनी दिल्लीतून आंदोलन मागे घेतल्यानंतरच्या काळातील हे त्यांचे सर्वात मोठे शक्तिप्रदर्शन मानले जात आहे. युनियनचे अध्यक्ष बुर्टांसग बुर्जगिल म्हणाले की, राज्यातील सत्तारूढ काँग्रेसचे उमेदवार प्रचारासाठी आल्यास त्यांना कठोर प्रश्न विचारा. कृषीकर्जमाफीच्या आश्वासनाचे काय झाले, शेतकरी आंदोलनात मृत्यू पावलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्याबाबत काय केले, हे प्रश्न त्यांना विचारा. सर्वच राजकीय पक्षांच्या उमेदवारांना असे प्रश्न विचारले जातील, असे त्यांनी स्पष्ट केले.