नवी दिल्ली : पूर्व लडाखमध्ये चिनी सैन्याचा खंबीरपणे मुकाबला करणे भारतीय लष्कर सुरूच ठेवेल, तसेच कार्यवाहीविषयक तयारीचा सर्वोच्च स्तरही कायम राखेल, असे लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे यांनी बुधवारी सांगितले. या भागात काही प्रमाणात अंशत: सैन्यतैनाती झाली असली, तरी धोका मात्र कुठल्याही प्रकारे कमी झालेला नाही, असे लष्कर दिनापूर्वी घेतलेल्या पत्रकार परिषदेत जनरल नरवणे म्हणाले. ‘आम्ही कार्यवाहीसंबंधी तयारीचा सर्वोच्च स्तर कायम राखला असून, याच वेळी चिनी लष्कराशी संवादही सुरू ठेवला आहे,’ असे लष्करप्रमुखांनी सांगितले. चीनच्या नव्या भूमी सीमा कायद्याच्या लष्करी परिणामांचा सामना करण्यासाठी भारतीय लष्कर पुरेपूर सज्ज आहे, असेही ते म्हणाले. चिनी लष्कराचा दृढपणे मुकाबला करणे आम्ही सुरूच ठेवू, तसेच कुठलीही आणीबाणीकालीन परिस्थिती हाताळण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत, याचाही त्यांनी आवर्जून उल्लेख केला. जैसे थे परिस्थिती एकतर्फी बदलण्याच्या चीनच्या प्रयत्नांना आमच्या फौजांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे, असेही जनरल नरवणे यांनी सांगितले.