तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी त्यांच्या फार्म हाऊसवर आयोजित केलेल्या चंडी यज्ञाच्या विधी सुरु असताना रविवारी दुपारी एका मंडपात आग भडकली. अग्निशमन दलाने वेळीच आगीवर नियंत्रण मिळवल्याने मोठी दुर्घटना टळली. या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती तेलंगणचे मंत्री के.टी.राव यांनी दिली.
अयुथा चंडी महायज्ञम वैश्विक कल्याण व शांतीसाठी करण्यात येत असून, तो २३ डिसेंबरला सुरू झाला आहे. या यज्ञावर राव यांनी सात कोटी रुपये खर्च केले आहेत. दरम्यान, या यज्ञावर सरकारी पैसा खर्च केलेला नसल्याचे राव यांनी सांगितले आहे. तामिळनाडूचे राज्यपाल के. रोसय्या, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काल या यज्ञाला उपस्थिती लावली  होती.