बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारचा ‘सम्राट पृथ्वीराज’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीपासूनच यावर राजकीय विधानं केली जात होती. आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी या चित्रपटाबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. भागवत म्हणाले की, “आतापर्यंत आपण इतरांनी लिहिलेला इतिहास वाचत होतो. पण आता आपण भारतीय नजरेतून भारताच्या इतिहासाकडे पाहत आहोत.”

भागवत यांनी ‘सम्राट पृथ्वीराज’ चित्रपटाबद्दल बोलताना पुढे म्हटलं की, “पृथ्वीराज चौहान, मोहम्मद घोरी यांच्या लढाईबाबत आपण आधी वाचलं आहे, पण ते कोणीतरी परक्यानं लिहिलं होतं. सध्या आपण भारतीय भाषेत लिहिलेलं आणि चित्रित केलेलं पहिल्यांदाच पाहातोय. आता आपण भारताचा इतिहास भारतीय नजरेनं पाहत आहोत. हा इतिहास समजून घेण्याची संधी देशातील नागरिकांना मिळत आहे. त्यामुळे देशाच्या भविष्यावर याचा चांगला परिणाम होईल,” असं भागवत यांनी म्हटलं आहे.

यापूर्वी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी नागपुरात संघ कार्यकर्त्यांना संबोधित करताना म्हटलं होतं की, येथून पुढे आरएसएस मंदिरांबाबत कोणतंही आंदोलन करणार नाही. त्याचबरोबर प्रत्येक मशिदीत शिवलिंगाचा शोध घेणं योग्य नसल्याचंही त्यांनी म्हटलं होतं. भागवत यांच्या या विधानानंतर राजकीय वातावरण चांगलंच तापलं होतं.