तामिळनाडूची राजधानी असलेल्या चेन्नई येथे ईशान्य मान्सूनच्या पावसाचा धुमाकूळ अजून सुरूच आहे, तेथे आज जोरदार पावसामुळे सगळे शहर पूरग्रस्त झाले असून विमानतळावर १५०० प्रवाशांसह एकूण ३५०० जण अडकून पडले आहेत. त्यांना विमानतळाबाहेर नेण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असे विमानतळ प्राधिकरणाने सांगितले. धावपट्टीवर पाणी साचल्याने विमानसेवा उद्या सकाळपर्यंत बंद केली आहे. येत्या ४८ तासात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

चेन्नईत पाऊस झाला असला तरी कांचीपूरम, तिरुवल्लूर, कडलोर येथे पावसाचा जोर कमी झाला असला तरी पाऊस थांबलेला नाही. लष्कर, नौदल, तटरक्षक दल व राष्ट्रीय आपत्ती दलाचे जवान तांबारम, मुडिचूर व ओरापक्कम येथे तैनात करण्यात आले आहेत. पोलीस व अग्निशमन दलाचे जवानही मदत करीत आहेत. तटरक्षक दलाने काही भागात बोटी पाठवल्या आहेत. चेन्नईत अभूतपूर्व पाऊस झाल्याचे सांगण्यात आले. हवामान खात्याचे महासंचालक लक्ष्मण सिंह राठोड यांनी सांगितले की, तामिळनाडूत आज ३५ से.मी. पाऊस झाला असून त्यामुळे हाहाकार उडाला. तेथे पावसाचा जोर ४८ तासात वाढणार असून आणखी ७२ तासांनी तो कमी होईल पण पाच-सात दिवस पाऊस सुरू राहणार आहे. जाफरखानपेट, सैदापेट, कोट्टुरपूरम, वडापालानी, वलसारवक्कम व पश्चिमेकडील भागात मदत पथके तैनात केली आहेत. वेलाचेरी, मडीपक्कम व आजूबाजूच्या भागात नोव्हेंबरमध्ये जोरदार पाऊस झाला असून आजही तेथे घरांमध्ये पाणी शिरले.