केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मंगळवारी उद्योग जगताची तुलना हनुमानाशी केली आहे. देशातील उद्योजक उत्पादन क्षेत्रात गुंतवणूक करण्यास संकोच का करत आहेत? गुंतवणूक करण्यापासून त्यांना कोणत्या गोष्टी रोखत आहेत, असा सवाल सितारामन यांनी केला आहे. त्या ‘माइंडमाइन’ शिखर परिषदेत बोलत होत्या.

यावेळी सितारामन म्हणाल्या की, विदेशी गुंतवणूकदार भारतावर विश्वास ठेऊन मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करत आहेत. मात्र, देशातील गुंतवणूकदार गुंतवणूक करण्यास काहीसा संकोच बाळगत असल्याचं दिसून येते. केंद्र सरकार उद्योगाशी जवळून काम करण्यास तयार आहे. त्यासाठी धोरणात्मक पावले उचलण्यासही तयार आहे. ही भारताची वेळ आहे, त्यामुळे ही संधी गमावून चालणार नाही. भारत सरकारने उत्पादन आधारित उद्योगांना प्रोत्साहन देणारी योजना आणली आहे. उत्पादन क्षेत्रातील गुंतवणुकीबाबतचे करही कमी केले आहेत. उद्योगांच्याबाबतीत कोणतेही धोरण अंतिम असू शकत नाही. जसे आपण पुढे जातो, तसे ते विकसित करावं लागतं.

हेही वाचा- पोलीस ठाण्यात गोळीबार केला का? त्या रात्री काय घडलं? सदा सरवणकरांनी सांगितला घटनाक्रम, म्हणाले…

पुढे त्यांनी म्हटलं की, मला उद्योग जगताकडून जाणून घ्यायचे आहे की ते गुंतवणूक करण्यास टाळाटाळ का करत आहेत. आम्ही भारतात उद्योग आणण्यासाठी आणि गुंतवणूक वाढण्यासाठी सर्व काही करू. पण मला भारतीय उद्योगांकडून ऐकायचे आहे की त्यांना गुंतवणूक करण्यापासून कोण रोखत आहे? विदेशी गुंतवणूकदार भारतावर विश्वास ठेवतात हे एफडीआय (फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट) किंवा एफपीआय (फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टमेंट) द्वारे करण्यात येणाऱ्या गुंतवणुकीतून स्पष्ट होतं.

हेही वाचा- “स्वत:साठी खोके आणि महाराष्ट्राला धोके” महाराष्ट्रात येणारा प्रकल्प गुजरातला गेल्याने आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल

“भारतीय उद्योगांची स्थिती हनुमानासारखी आहे का? तुम्हाला तुमच्या क्षमतेवर, तुमच्या ताकदीवर विश्वास नाही. त्यामुळे कोणीतरी तुमच्या शेजारी येऊन उभं राहतं आणि तुम्हाला सांगतं की तुम्ही हनुमान आहात, हे करा? ती व्यक्ती कोण आहे, जी हनुमानाला सांगेल? हे नक्कीच सरकार असू शकत नाही” असंही निर्मला सितारामन म्हणाल्या.