कोलंबो : श्रीलंकेचे माजी राष्ट्रपती गोताबया राजपक्षे हे लपलेले नसून ते सिंगापूरहून मायदेशी परतण्याची शक्यता आहे. मंत्रिमंडळाचे प्रवक्ते बंदुला गुणवर्धने यांनी मंगळवारी ही माहिती दिली. राजपक्षे यांनी ९ जुलै रोजी झालेल्या जनआंदोलनाच्या उद्रेकानंतर श्रीलंकेतून पलायन केले होते. १९४८ पासून प्रथमच श्रीलंकेला अभूतपूर्व आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. अर्थव्यवस्थेबाबत अपयशी ठरल्याबद्दल राजपक्षे यांच्या विरोधात अनेक महिन्यांच्या निदर्शने-आंदोलनानंतर नागरिकांनी राष्ट्रपती निवासस्थान ताब्यात घेतले होते. त्यानंतर १३ जुलैला राजपक्षे मालदीवला गेले व दुसऱ्या दिवशी ते सिंगापूरला रवाना झाले होते. मंगळवारी मंत्रिमंडळाच्या साप्ताहिक बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना पत्रकारांनी राजपक्षे यांच्याबद्दल विचारले असता, मंत्रिमंडळाचे प्रवक्ते व परिवहन, महामार्ग आणि जनसंपर्क मंत्री गुणवर्धने यांनी सांगितले, की माजी अध्यक्ष हे सिंगापूरमध्ये लपलेले नाहीत. ते सिंगापूरहून परत येण्याची शक्यता आहे. गोताबया देशातून पळून जाऊन लपले आहेत, यावर माझा विश्वास नाही. मात्र, त्यांनी राजपक्षेंच्या संभाव्य पुनरागमनाबाबत इतर कोणताही तपशील सांगितला नाही. सिंगापूरने १४ जुलै रोजी श्रीलंकेच्या गोताबया यांना खासगी भेटीसाठी सिंगापूरमध्ये १४ दिवसांचा अल्प मुदतीचा प्रवासी पास मंजूर केला आहे. सिंगापूरमधील परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने यापूर्वी सांगितले होते की राजपक्षे यांनी सिंगापूरमध्ये आश्रय घेतला नाही किंवा त्यांना आश्रय दिला गेलेला नाही. सिंगापूरमध्ये अल्पकाळ आश्रय सिंगापूरच्या ‘इमिग्रेशन अँड चेकपोस्ट अथॉरिटी’ने (आयसीए) सांगितले, की सामाजिक कारणांसाठी श्रीलंकेतून सिंगापूरला येणाऱ्यांना सहसा अल्प मुदतीचे प्रवासी पास दिले जातात. त्याची महिनाभर मुदत असते. सिंगापूरमध्ये ज्यांचा मुक्काम वाढवायचा आहे त्यांनी या पासच्या मुदतवाढीसाठी ‘ऑनलाइन’ अर्ज करणे आवश्यक आहे. अशा अर्जावर व्यक्तिनिहाय वेगवेगळा विचार केला जातो. गोताबयांना ताब्यात घेण्याच्या सिंगापूरच्या महाधिवक्त्यांना केल्या गेलेल्या विनंतीवर प्रतिक्रिया व्यक्त करताना, मंत्रिमंडळ प्रवक्त्याने सांगितले, की परिस्थितीनुसार देशातील जबाबदार अधिकारी गोताबया यांना कोणतीही इजा न पोहोचवता आवश्यक पावले उचलतील.