प्रत्येक पात्र व्यक्तीचं लसीकरण पूर्ण व्हावं याकरिता तामिळनाडूच्या निलगिरी जिल्ह्यातील अधिकाऱ्यांनी एक नामी शक्कल लढवली आहे. सरकारी TASMAC आउटलेटमधून दारू खरेदी करू इच्छिणाऱ्यांसाठी आता करोना प्रतिबंधक लसीकरण करणं अनिवार्य करण्यात आलं आहे. म्हणजेच, दारू खरेदीसाठी आता ग्राहकांना आपले दोन्ही डोस पूर्ण झाल्याचं लसीकरण प्रमाणपत्र सादर करावं लागणार आहे. ही कारवाई म्हणजे सर्व नागरिकांचं लसीकरण पूर्ण करण्याच्या मोहिमेचा एक भाग आहे, असं जिल्हाधिकारी दिव्या यांनी गुरुवारी (२ सप्टेंबर) सांगितलं आहे.

“जिल्ह्यातील जवळजवळ ९७% लोकसंख्येला करोना प्रतिबंधक लसीचे डोस देण्यात आले आहेत”, असं सांगून जिल्हाधिकारी दिव्या पुढे म्हणाल्या की, आता आम्हाला (प्रशासनाला) जिल्ह्यातील सर्व नागरिकांना लसीचा दुसरा देखील डोस देऊन ही लसीकरण मोहीम पूर्ण करायची आहे. हे लक्ष्य गाठण्यासाठी आम्हाला ही नवी कल्पना सुचली आहे. दरम्यान, लसीकरण प्रमाणपत्रांव्यतिरिक्त ग्राहकांना TASMAC आउटलेटमधून दारू खरेदी करण्यासाठी त्यांचं आधार कार्ड सादर करणं देखील अनिवार्य असणार आहे.

यंदाही घरीच सण साजरे करा, नाहीतर…; करोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारचा इशारा

लहानशी चूक, मोठं आव्हान

देशात सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये करोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका वर्तविण्यात आला आहे. त्यातच, हा काळ अनेक सण-उत्सवांचा आहे. त्यामुळे, केंद्र सरकराने, नागरिकांना मोठ्या संख्येने एकत्र जमण्यास मनाई केली आहे. आयसीएमआरचे महासंचालक डॉ बलराम भार्गव म्हणाले कि, एखाद्या सण-उत्सवात अथवा मेळाव्यात जर तुम्हाला उपस्थित राहायचं असेल तर तुम्ही लसीचे दोन्ही डोस घेऊन पूर्ण करणं आवश्यक आहे.

नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल हे देखील याबाबत इशारा देताना म्हणाले कि, “जर आपण आता थोडीशी जरी चूक केली तरी सध्या नियंत्रणात असलेला संसर्ग पुन्हा भयावह रूप धारण करू शकतो. यामुळे, आपले सगळे कष्ट व्यर्थ जातील”.

सणासुदीत सावधगिरी बाळगा; केंद्राचे आवाहन

निष्काळजीपणामुळे संसर्ग वाढण्याचा धोका

डॉ. व्ही. के. पॉल म्हणाले की, “आवश्यक असेल तरच घराबाहेर पडा आणि मास्क वापरा. करोना संपला असं समजू नका. मास्क वापरणं सोडून देण्यात वेळ अद्याप आलेली नाही. सध्याच्या संक्रमणाच्या काळात तुम्ही सर्वांनी गेल्या वर्षीप्रमाणेच यंदाही सर्व सण साधेपणाने घरातच साजरे केलेत तर खूप योग्य होईल. संसर्गाची गती मंदावली आहे. परंतु आपली जराशा निष्काळजीपणामुळे ती पुन्हा वाढू शकते.” याचसोबत करोना व्हायरसच्या म्यूटेशनबाबत इशारा देताना डॉ पॉल म्हणाले की, “जेव्हा जेव्हा विषाणू बदलतो म्हणजे म्यूटेट होतो तेव्हा तो संपूर्ण यंत्रणा हादरवून टाकतो.”