जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारवर हल्लाबोल करत गांधींचा भारत गोडसेचा भारत झाला आहे असे वाटते, असे म्हटले आहे. भारत पाकिस्तान क्रिकेट सामन्याचे उदाहरण देत त्यांनी अटल बिहारी वाजपेयी यांच्या काळांची आठवण करुन दिली. तसेच केंद्रशासित प्रदेशातील लोकांच्या कथित दडपशाहीच्या निषेधार्थ मेहबूबा मुफ्ती यांनी सोमवारी जंतरमंतर येथे आंदोलन केले आणि निरपराधांची हत्या त्वरित थांबवण्याची मागणी केली.

“मला वाजपेयीजींच्या काळात भारत आणि पाकिस्तान यांच्यातील एक क्रिकेट सामना आठवतो, जिथे पाकिस्तानचे नागरिक भारताचा जयजयकार करत होते आणि भारतीय नागरिक पाकिस्तानचा जयजयकार करत होते. पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांनीही तत्कालीन भारतीय कर्णधार एमएस धोनीचे कौतुक केले होते,” असे मुफ्ती म्हणाल्या.

“काही दिवसांपूर्वी आग्रा येथे भारतासोबतच्या सामन्यादरम्यान काही तरुणांनी पाकिस्तानी क्रिकेट संघाचा जयजयकार केला तेव्हा एकही वकील त्यांची बाजू घ्यायला तयार नव्हता. त्यामुळे आता गांधींचा भारत आता गोडसेचा भारत होत असल्याचे दिसून येत आहे,” असे पुढे मेहबुबा मुफ्ती यांनी म्हटले आहे.

जम्मू आणि काश्मीर पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी (पीडीपी) च्या अध्यक्षा मेहबुबा मुफ्ती यांनी सांगितले की त्यांनी राष्ट्रीय राजधानीत आंदोलन करण्याचा निर्णय घेतला कारण त्यांनाला काश्मीरमध्ये कधीही निषेध नोंदवण्याची परवानगी नव्हती. तिथे एकतर तिच्या घरी ताब्यात घेण्यात आले आणि प्रत्येक वेळी जेव्हा तिने निषेधाची योजना आखली तेव्हा पोलिसांनी त्यांना दूर नेले.

दरम्यान, जंतरमंतर येथे झालेल्या निदर्शनात पीडीपीचे शेकडो कार्यकर्ते सामील झाले होते. “काश्मीर एक तुरुंग बनले आहे जिथे लोकांना त्यांचे मत मांडण्याची परवानगी नाही. ऑगस्ट २०१९ पासून त्यांच्यावर दडपशाही केली जात आहे आणि मला आश्चर्य वाटले की सरकार काही सशुल्क माध्यमांच्या मदतीने खोऱ्यात सर्व काही चांगले असल्याचे चित्रण करण्यात व्यस्त आहे, ”असे मुफ्ती म्हणाल्या.

ऑगस्ट २०१९ मध्ये, घटनेच्या कलम ३७० अंतर्गत जम्मू आणि काश्मीरचा विशेष दर्जा रद्द करण्यात आला आणि राज्याचे केंद्रशासित प्रदेशांमध्ये विभाजन करण्यात आले. यावेळी माजी मुख्यमंत्र्यांनी पोलिसांच्या प्रत्येक कारवाईवर प्रश्न उपस्थित केल्याचा आरोप फेटाळून लावला. “जेव्हा जेव्हा चकमक होते आणि एखादा अतिरेकी मारला जातो तेव्हा कोणीही प्रश्न विचारत नाही पण जेव्हा एखादा नागरिक मारला जातो, तेव्हाच लोक बाहेर येतात आणि प्रश्न विचारू लागतात,” असे त्या म्हणाल्या.