ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांचे मारेकरी येत्या काही आठवड्यांमध्ये गजाआड असतील असा विश्वास कर्नाटकचे गृहमंत्री रामलिंगा रेड्डी यांनी व्यक्त केला आहे. पुढच्या एक ते दोन आठवड्यांमध्ये मारेकरी पकडले जातील असे नाही, मात्र काही आठवड्यांमध्ये गौरी लंकेश यांचे मारेकरी गजाआड असतील असे रेड्डी यांनी स्पष्ट केले. ५ सप्टेंबर रोजी गौरी लंकेश यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. या घटनेने सगळा देश हादरला होता.

गौरी लंकेश यांच्या हत्येचा तपास करणाऱ्या विशेष तपास पथकाकडे (एसआयटी) हल्लेखोरांविरोधात सबळ पुरावे आहेत. हे पुरावे नेमके काय आहेत हे आत्ता सांगणे योग्य ठरणार नाही. एसआयटीने कोणत्या दिशेने तपास केला आहे याबाबत मला माहिती आहे असेही रेड्डी यांनी म्हटले आहे. महाराष्ट्रात नरेंद्र दाभोलकर आणि गोविंद पानसरे या दोन विचारवंतांच्या हत्या झाल्या. त्यांचे मारेकरी अद्याप मोकाटच आहेत. मात्र पत्रकार गौरी लंकेश यांच्याबाबतीत असे घडणार नाही. त्यांचे मारेकरी लवकरात लवकर पकडले जातील असेही रेड्डी यांनी म्हटले आहे. प्रेस क्लब ऑफ बंगळुरू रिपोर्टर गिल्ड तर्फे एक संमेलन आयोजित करण्यात आले होते. त्यामध्ये रेड्डी यांनी ही प्रतिक्रिया दिली.

५ सप्टेंबर २०१७ रोजी गौरी लंकेश यांची त्यांची राहत्या घरात हत्या करण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी १७ ऑक्टोबर रोजी एका संशयिताचे रेखाचित्र जारी केले. एसआयटीने सीसीटीव्ही फुटेज अमेरिकेतील लॅबमध्ये पाठवले, त्याआधारे संशयिताचे फोटो मिळवले. गौरी लंकेश यांच्या घराजवळ असलेल्यी सीसीटीव्ही कॅमेराच्या आधारे हे फुटेज एसआयटीला मिळाले. काही प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार रेखाचित्र तयार करण्यात आल्याचेही एसआयटीने म्हटले आहे.