अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ, सरहद्द संस्था आणि पंजाब राज्य शासन यांच्या संयुक्त विद्यमाने घुमान येथे आयोजित करण्यात आलेल्या ८८ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनास शुक्रवार ३ एप्रिलपासून सुरूवात होत आहे. साहित्य संमेलनाच्या उदघाटनाचा मुख्य सोहळा दुपारी चार वाजता सुरू होणार आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे उदघाटक तर, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि पंजाबचे मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
संमेलनाच्या निमित्ताने ग्रंथदिंडी काढण्यात येणार असून घुमान येथील नामदेव महाराज दरबार ट्रस्ट येथून सकाळी दहा वाजता याची सुरूवात होणार आहे. घुमान शहरातील मुख्य रस्त्यावरून दिंडी फिरून संमेलन स्थळी तिची सांगता होणार आहे. ग्रंथदिंडीच्या पालखीत संत नामदेवांची ब्रेललिपीतील गाथा ठेवण्यात येणार असल्याचे संमेलनाचे स्वागताध्यक्ष भारत देसडला यांनी सांगितले. ज्ञानपीठ पुरस्कार विजेते पंजाबी लेखक गुरूदयाल सिंह हे प्रकृती अस्वस्थामुळे हजर राहणार नसल्याने त्यांच्या शुभेच्छा संदेशाची ध्वनिचित्रफीत दाखवली जाणार आहे. मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल यांच्या भाषणाने उदघाटन सोहळ्याचा समारोप होईल. तत्पूर्वी संमेलनाध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांचे अध्यक्षीय भाषण होणार आहे.