झारखंडचे आरोग्य मंत्री बन्ना गुप्ता यांनी देश करोनाच्या संकटाचा सामना करत असतानाच करोनाची लस निर्मिती करणाऱ्यांना देशातील सर्वोच्च नागरी सन्मान म्हणजेच भारतरत्न पुरस्कार देण्याची मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे केलीय. पंतप्रधान मोदींनी गुप्ता यांनी एक पत्र लिहिलं आहे. देशातील प्रतिभावान वैज्ञानिकांनी खूप कमी वेळामध्ये फार काम केलं असून स्वदेशी लसींच्या माध्यमातून देशातील नागरिकांचा जीव वाचवण्यासाठी मोलाचं योगदान दिलं आहे. त्याच्या या कार्यासाठी १५ ऑगस्टनिमित्त या वैज्ञानिकांना सन्मानित करण्यात यावं अशी मागणी गुप्ता यांनी मोदींकडे केलीय.

नक्की वाचा >> या फोटोत पुढे दिसणारे दोघे वैज्ञानिक तर मागून चालणारे देशातील सर्वोच्च नेते, कारण वाचून थक्क व्हाल

गुप्ता यांनी मोदींना लिहिलेल्या पत्रामध्ये करोनाच्या प्रादुर्भावाच्या कालावधीमध्ये स्वदेशी लसींची निर्मिती करणाऱ्या वैज्ञानिकांचं मनोधैर्य वाढवण्यासाठी त्यांना भारतरत्नसारखा मोठा सन्मान देऊन गौरवण्यात यावं असं म्हटलं आहे. जागतिक महासाथीमुळे सर्वसामान्य आयुष्य, व्यापार आणि नियोजनाला मोठा फटका बसलाय. करोनाच्या दोन लाटा भारतात येऊन गेल्या त्यामध्ये अनेकांनी आपल्या नेतावाईकांना आणि जवळच्या व्यक्तींना गमावलं आहे. तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवण्यात येत असून संपूर्ण देशासोबत झारखंडही पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली या अघोषित युद्धामध्ये लढण्यासाठी पूर्णपणे सज्ज असल्याचं या पत्रामध्ये गुप्ता यांनी म्हटलं आहे.

नक्की वाचा >> “सर्व चांगल्या गोष्टींचं श्रेय स्वत: घ्यायचं अन् वाईटासाठी राज्य सरकारांना दोषी ठरवायचं, अशी मोदींची वृत्ती”

देशांतर्गत निर्माण करण्यात आलेल्या लसी आणि लसीकरणासंदर्भातील नियोजनबद्ध कार्यक्रमामध्ये अनेकांना करोनाच्या संसर्गापासून बऱ्याच मोठ्या प्रमाणात संरक्षण मिळाल्याचंही गुप्ता यांनी आपल्या पत्रात नमूद केलं आहे. लसीकरणामुळे लोकांची रोगप्रतिकारशक्ती वाढली. त्यामुळे या साथीचा प्रभाव नियंत्रणात ठेवण्यात यश मिळालं. तसेच यामुळे जागतिक स्तरावर आत्मनिर्भर भारताचा संदेश पोहचला, असंही गुप्ता यांनी म्हटलं आहे.

नक्की वाचा >> “रडत राहणं काहींच्या स्वभावामध्येच असतं, मात्र माझा रडण्यावर विश्वास नाही आणि…”; मोदींचा जुना व्हिडीओ व्हायरल

खूप कमी वेळामध्ये करोनापासून संरक्षण मिळवण्यासाठी लसींची निर्मिती करण्याच्या कामामध्ये सहभागी असणाऱ्यांचे पंतप्रधान मोदींनी देशाच्या वतीने जाहीर आभार मानले पाहिजेत, अशी इच्छाही गुप्ता यांनी व्यक्त केलीय. करोना लसीच्या निर्मितीमध्ये मोलाचं योगदान देणाऱ्या या देशभक्त वैज्ञानिकांना स्वातंत्रदिनी भारतरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात यावं. पंतप्रधान मोदींनी असं केल्यास या वैज्ञानिकांकडे देशातील युवा पिढी आदर्श म्हणून पाहतील, असंही गुप्ता म्हणालेत.

नक्की वाचा >> कौतुकास्पद! विराट, अनुष्काने वाचवले चिमुकल्याचे प्राण; जगातील सर्वात महागड्या औषधाची होती गरज

जर्मनीने लसनिर्मात्यांना दिलाय सर्वोच्च सन्मान

फायझर-बायोएनटेकच्या लसीच्या निर्मितीमध्ये अर्धा वाटा असणाऱ्या जर्मनीतील बायोएनटेक कंपनीचे सर्वेसर्वा असणाऱ्या  डॉ. उजूर साहान (Uğur Şahin )आणि त्यांची पत्नी ओझल तुरेशी (Özlem Türeci) या जोडप्याचा जर्मन सरकारने मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात देशातील सर्वोच्च नागरी सन्मान देऊन गौरव केलाय.  करोना विरुद्धच्या लढ्यामध्ये फायझरची लस शोधण्यात मोलाचं योगदान देणाऱ्या या जोडप्याचा ‘ग्रॅण्ड क्रॉस ऑफ मेरीट विथ स्टार’ हा जर्मनीमधील सर्वोच्च पुरस्कार प्रदान करण्यात आला.