चीनमधील सरकारी प्रसारमाध्यमाने अमेरिकेला पुन्हा एकदा मोठ्या दहशतवादी हल्ला होण्यासंदर्भात इशारा दिलाय. ग्लोबल टाइम्सचे संपादक हू शिजिन यांनी अमेरिकेवर पुन्हा ९/११ सारखा हल्ला होऊ शकतो अशी भीती व्यक्त केलीय. शिजिन यांनी ९/११ च्या हल्ल्याला २० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त बोलताना ही शंका बोलून दाखवलीय.

ग्लोबल टाइम्सच्या संपादकांनी, “११ सप्टेंबरचा हल्ला १९ दहशतवाद्यांनी केला होता. तो आत्मघाती हल्ला होता. मात्र हा दहशतवादी वृत्तीचा आत्मघात करणारा हल्ला नव्हता. आता दहशतवादी पुन्हा दुसऱ्या हल्ल्यासाठी सर्व शक्ती एकजूट करुन तयार होतील. तसेच चीनला आपला सर्वात मोठा शत्रू समजणं ही आपली चूक होती हे ही अमेरिकेला काळानुरुप समजेल,” असं मत व्यक्त केलंय. चीन आणि अमेरिकेचे संबंध कमालीचे बिनसले आहेत. चीनमध्ये उइगर मुस्लिमांवर होणाऱ्या अत्याचारांचं कारण देत अमेरिका आणि इतर सहकारी देशांनी चीनवर अनेक निर्बंध लादले आहेत.

नक्की वाचा >> लादेनचा साथीदार ९/११ च्या अल-कायदाच्या व्हिडीओत झळकला; अमेरिकेलाही बसला धक्का, कारण…

११ सप्टेंबर रोजी अमेरिकेवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याला २० वर्षे पूर्ण झाली. त्याच पार्श्वभूमीवर चीनचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते झाओ लिजियान यांनी अमेरिकेला खडे बोल सुनावले होते. अमेरिकने त्यांची विचारसणी आणि राजकीय फायद्यानुसार दहशतवादाची व्याख्या तयार करणं थांबवलं पाहिजे, असा टोला लिजियान यांनी लगावला होता. “दहशतवादी हे केवळ दहशतवादी असतात. राजकीय फायदा पाहून दहशतवाद्यांबद्दल मत निर्माण करणं म्हणजे दहशतवादी कारवायांकडे दूर्लक्ष करण्यासारखंच आहे. त्यामुळेच जागतिक स्तरावरील दहशतवादाविरुद्धची लढाई कमकूवत होते,” असं लिजियान म्हणाले होते.

नक्की वाचा >> तालिबान-चीन संबंधांवर जो बायडेन यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “चीन आणि तालिबानचे संंबंध…”

भारताबद्दलही केलेलं वक्तव्य

ग्लोबल टाइम्सचे संपादक हू शिजिन हे कम्युनिस्ट पक्ष आणि सत्ताधारी शी जिनपिंग यांचे समर्थक आहेत. अनेकदा ते चिनी सरकारच्या बाजूनेच भूमिका माडताना दिसतात. भारत चीन सीमावादावर बोलतानाही त्यांनी यापूर्वी भारताला धमकावलं होतं. भारतीय सैनिजकांनी पैंगोंग तळ्याच्या दक्षिण किनाऱ्यावरुन माघार घेतली नाही तर चिनी सेना संपूर्ण हिवाळ्यामध्ये भारताविरोधात लढाई करु शकते. भारतीय सैनिकांचे संचालन तंत्र फारच वाईट आहे, अशा शब्दांमध्ये शिजिन यांनी टीका केली होती. हिवाळ्यामध्ये युद्ध झाल्यास अनेक भारतीय सैनिकांचा थंडीमुळे मृत्यू होईल किंवा ते करोनामुळे मरण पावतील असं वादग्रस्त विधानही शिजिन यांनी केलं होतं.

नक्की वाचा >> “…म्हणून अफगाणिस्तान सोडण्याशिवाय काही पर्याय नव्हता”; सैन्य माघार घेण्याचं कारण सांगताना बायडेन यांनी केला चीन, रशियाचा उल्लेख

भारत आणि चीनमध्ये युद्ध झाल्यास भारताला लवकर पराभूत करता येईल असा दावा शिजिन यांनी केला होता. ट्विटरवरुन हे वक्तव्य केल्यानंतर त्यांच्यावर फार टीका करण्यात आली होती. अनेकांनी त्यांना ट्रोल करतानाच सियाचीनसंदर्भात प्रश्न विचारले होते. अनेक भारतीयांनी आम्हाला घाबरवण्याचा प्रयत्न आणि या भाकड कथा इतर कोणाला तरी जाऊन सांगा. भारतीय लष्कर कोणत्याच प्रकारे चीनचा सामना करण्यासाठी कमोजर असल्याचा शिजिन यांचा दावा भारतीयांनी खोडून काढत शिजिन यांना ट्रोल केलेलं.

नक्की वाचा >> तालिबानला एकाकी झुंजणाऱ्या सालेह यांचा अफगाणिस्तान सोडणाऱ्या अमेरिकेला टोमणा; म्हणाले, “सुपर पॉवर म्हणवणाऱ्यांनी…”

अमेरिकेने २० वर्षानंतर सैन्य माघारी घेतलं…

११ सप्टेंबर २००१ म्हणजेच २० वर्षांपूर्वी ओसामा बिन लादेनच्या नेतृत्वाखाली ‘अल-कायदा’ने अमेरिकेवर दहशतवादी हल्ला केला होता. त्यात वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या दोन मोठ्या इमारती त्यांनी उद्धवस्त केलेल्या. त्यानंतरच अमेरिकेने आपल्या लष्करासहीत अफगाणिस्तानवरील तालिबानच्या तळांवर हल्ला करत पहिल्यांदा अफगाणिस्तानच्या भूमीवर पाऊल ठेवलं होतं. त्यावेळी अफगाणिस्तानमध्ये तालिबानचं सरकार होतं. अमेरिकने त्यानंतर अफगाणिस्तानमध्ये सत्तांतर घडवून आलं होतं. हा संघर्ष २० वर्षे चालला अखेर अमेरिकने ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यामध्ये आपलं संपूर्ण सैन्य अफगाणिस्तानमधून मागे घेत असल्याची घोषणा केलीय.